प्रतिनिधी/ शाहुवाडी
देशभरात कोरोना विषाणूचा फैलाव सुरू आहे. हा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आलेल्या आदेशानुसार संचारबंदी आदेशाची अंमलबजावणी करताना मलकापूर (ता. शाहुवाडी) येथील पेरीड नाक्यावर बंदोबस्तावेळी वाहनधारकांशी अशोभनीय वर्तन केल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शाहुवाडी पोलीस ठाण्यातील दोघा कर्मचाऱ्यांची जिल्हा मुख्यालयाकडे तडकाफडकी बदली केली आहे.
हेडकॉन्स्टेबल श्रीकांत दाभोळकर (बक्कल नं. १०३५), पोलीस वाहनचालक शिवाजी शिंदे (बक्कल नं. १४५७) या दोन कर्मचाऱ्यांना या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
संचारबंदीच्या दरम्यान नागरिकांचा पोलिसांशी वादविवाद झाल्याच्या घटना याआधीही अनेक ठिकाणी झाल्या आहेत. परंतु अशाप्रकारे वरिष्ठांकडून पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याने नागरीकांच्यातून आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची करणाऱ्या अशा कारवाईबाबत पालकमंत्री सतेज पाटील तसेच गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे याबाबीत ही लक्ष वेधणार असल्याचे शाहूवाडी पंचयत समितीचे उपसभापती विजय खोत यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना मत स्पष्ट केले आहे.
दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांवरील कारवाईचा फेरविचार करावा, प्रसंगी कारवाई शिथिल व्हावी यासाठी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे तालुका पत्रकार संघाच्या वतीने विनंती केली आहे.