भाजप अध्यक्ष नड्डा यांचा आक्षेप, दुहेरी डावपेचांसाठी टीका
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
संसदीय संरक्षण समितीच्या बैठकांना राहुल गांधी नेहमीच दांडी मारतात, पण भारतीय सेनेचा अवमान करण्याची एकही संधी मात्र सोडत नाहीत, अशी खोचक टीका भापजचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली आहे. राहुल गांधींचा समावेश संरक्षण समितीसारख्या अतिमहत्वाच्या समितीत करण्यात आला आहे. त्यांनीही या समितीत सहभागी होण्यास मान्यता दिली आहे. मात्र, समितीच्या कामकाजात ते कधीही भाग घेत नाहीत, हे दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.
लडाख येथील संघर्षाच्या काळात भारताने भूमी गमावली अशी खोटी विधाने करून गांधींनी आपल्या सैनिकांच्या क्षमतेवरच शंका उपस्थित केली. असे करून त्यांनी सेनादलांचा अवमान केला. सैनिकांच्या रक्ताचेही त्यांनी राजकारण केले. भारतीय सेनेचा असा पदोपदी अवमान करण्याची संधी शोधणारे राहुल गांधी संरक्ष समितीच्या बैठकांना मात्र अनुपस्थित राहतात. याचाच अर्थ त्यांना सैनिक आणि सेना यांच्या हिताची कोणतीही चिंता नाही. त्यांना केवळ राजकीय लाभ उपटायचा आहे. म्हणूनच ते सेनेच्या पराक्रमावर संयश व्यक्त करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात, अशी टीका नड्डा यांनी केला.
त्यांची हीच ‘वैभवी’ परंपरा
राहुल गांधी ज्या घराण्याचे वारसदार आहेत त्या घराण्याला कधीच ‘डिफेन्स कमिटी’ कधीच महत्वाची वाटलेली नाही. त्यांना केवळ ‘डिफेन्स कमिशन’ (संरक्षण व्यवहारातील दलाली) महत्वाची वाटलेली आहे. हे राहुल गांधी यांच्या बैठकांना अनुपस्थित राहण्याच्या कृतीवरून स्पष्ट होते, असाही टोला नड्डा यांनी लगावला.