कडोली गावचे सुपुत्र आणि ग्रामस्थांसाठी आदर्श असणारे सदाशिवराव भोसले यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाने गावासाठी असणारे ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे. गांधी तत्त्वांना त्यांनी आपला आदर्श मानला होता. आणि त्यानुसारच अखेरपर्यंत त्यांनी कार्य केले. त्यांची उक्ती व कृती यांच्यामध्ये साम्य असल्याने पुढील पिढय़ांनासुद्धा ते आदर्श ठरले.
सदाशिवराव भोसले यांचा जन्म 16 डिसेंबर 1920 मध्ये झाला. ते दोनवेळा आमदार म्हणून निवडून आले होते. विद्यार्थी दशेत असतानाही त्यांचा कल भारताच्या स्वातंत्र्य चळवळीकडे होता. 1942 मध्ये ते वन अधिकारी पदासाठी मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी पुण्याला गेले होते. त्यावेळी म. गांधींनी ‘भारत छोडो आंदोलन’ सुरू केले होते. आणि सदाशिव भोसले त्या मुलाखतीला न जाता चळवळीच्या रिंगणात उतरले.
त्यांना दोन वर्षांपेक्षा जास्त येरवडा मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले. तेथे त्यांच्यावर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव पडला. बापूंच्या स्वप्नांनुसार राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपले जीवन समर्पित करण्यावर ते ठाम होते. त्यापासून त्यांचे कुटुंबीय देखील त्यांना रोखू शकले नाहीत. श्रीमंत कुटुंबातील असूनही मंदिरात वत्सला यांच्याशी विवाह केला. त्यांनी खादी धाग्यांनी बनविलेले मंगळसूत्र आपल्या पत्नीच्या गळय़ात बांधले. त्यांनी साध्या प्रकारच्या विवाहाचा संदेश दिला.
अखिल भारतीय प्रज्ञा परिषद
1946 मध्ये कडोली येथे अखिल भारतीय प्रज्ञा परिषद भरवून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. या परिषदेला मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, बाळासाहेब खेर आदी नेते उपस्थित होते.
1947 मध्ये पहिल्यांदा झालेल्या निवडणुकांमध्ये ते दक्षिण बेळगावचे आमदार म्हणून निवडून गेले. यामुळे त्यांना आपल्या लोकांची सेवा करण्याची आणि त्यांचे प्रेम मिळवण्याची संधी मिळाली. 1952 मध्ये बागेवाडी येथून ते दुसऱयांदा आमदार म्हणून निवडून गेले. तथापि, प्रशासन गांधीजींच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचे सांगत त्यांनी 1955 मध्ये विनोबा भावे यांच्या उपस्थितीत आपल्या आमदारकीचा राजीनामा देणारे भारतातील पहिले आमदार होते.
ग्रामस्वराज्य आणि भूदान चळवळीत सहभाग
आचार्य विनोबा भावे यांच्या ग्रामस्वराज आणि भूदान चळवळीत सामील झाल्याने भोसले यांनी कर्नाटकचा प्रवास केला. ते उत्तर कन्नड जिल्हय़ातील मुंडगोड येथील कोसुरु येथे सहा वर्षे राहिले. जिथे त्यांनी लोकांना प्रशिक्षण दिले आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणले. तेथून ते आपल्या गावी परतले. त्यांनी आपल्या वडिलांची खात्री पटवून दिली. एकूण 25 एकर जागेपैकी 24 एकर जमीन आर्थिकदृष्टय़ा दुर्बल लोकांना दान दिली आणि इतरांनाही भूदान चळवळीचा अवलंब करण्यास उद्युक्त केले.
गावच्या सार्वजनिक संस्थांमध्ये निवडणूक होवू नये, वाद होवू नयेत, यासाठी त्यांचे प्रयत्न मोलाचे ठरले. त्यामुळे 1980 पर्यंत गावात निवड प्रक्रिया सर्व संमतीने होत होती. कडोली येथे अखिल भारतीय शांती सेनेचे शिबिर भरविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. या शिबिराला देशभरातून 800 हून अधिक लोक आले होते.
गोविंद धाम ट्रस्टची स्थापना
मुंबई राज्यातील पहिला गावकट्टा त्यांनी कडोली येथे केला. गेल्या वीस वर्षांपूर्वी गांधीघर येथे गोविंद धाम ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टतर्फे बेकिनकेरे, बंबरगा, देवगिरी, कडोली येथे चार अंगणवाडय़ा कार्यरत आहेत.
त्यांनी देवगिरी येथे एक एकर जागेवर ‘गांधी घराची’ स्थापना केली. आयुष्यभर गांधीजींच्या तत्त्वांचा प्रसार करण्यासाठी ते तेथे राहण्यासाठी गेले. महिला सबलीकरणाला प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी कस्तुरबा केंद्र सुरू केले. 1960 मध्ये त्यांनी त्यांच्या गावात दारूचे दुकान सुरू करण्यास विरोध दर्शविला. या लढय़ाला यश येऊन अखेर सरकारने परवाना रद्द केला.
आजपर्यंत 101 वर्षांच्या सदाशिव बापुसाहेब भोसले यांनी स्वतःच्या माजी स्वातंत्र्यसैनिक पेन्शनमधून एक रुपयाही खर्च केलेला नाही. गांधी सिद्धांताचा प्रचार करण्यासाठी त्यांनी मुधोळ, बागलकोट येथे वात्सल्य धाम स्थापित करण्यासाठी या सर्वांचा उपयोग केला आहे. गांधीघर येथे बऱयाच सार्वजनिक सभा घेतल्या जातात. अखेरपर्यंत ते सामाजिक कार्यात व्यस्त होते.
– बेळगाव