जमात इ इस्लामी हिंद संघटनेचा उपक्रम : गोव्यासह देशभरात विविध कार्यक्रम
प्रतिनिधी / पणजी
कौटुंबिक मतभेद, घरगुती हिंसाचार, महिलांवरील अत्याचार, घटस्फोट यासारख्या विविध कारणांमुळे सध्या कुटुंबे विभागली जात आहेत. संपूर्ण देशभरात हे प्रकार मोठय़ा प्रमाणात वाढीस लागले आहेत. त्यातून लहान मुले, तरुण, वृद्ध आणि एकुणच संपूर्ण समाजव्यवस्थेवरच गंभीर परिणाम होऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत कुटुंबव्यवस्थेत सुसुत्रता आणणे हे महा कठीण काम बनून राहिले आहे. या सर्वांचा शोध, बोध आणि उपाययोजना असा हेतू ठेवून जमात ई इस्लामी हिंद या संघटनेतर्फे आजपासून ‘सदृढ कुटुंब सदृढ समाज’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रव्यापी मोहिम हाती घेण्यात आली आहे.
पणजीत मिरामार येथे तत्वज्ञान आणि मानवता अभ्यास केंद्रात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. संघटनेच्या गोवा शाखा सदस्य अंब्रीन बेग, सहयोगी श्रीमती तेहनाज झत्तू आणि गर्लस् इस्लामिक संघटनेच्या अध्यक्ष झेबा खान पठाण यांची पत्रकार परिषदेस उपस्थिती होती.
समाजात सध्या कुटुंबव्यवस्थेबद्दल अनास्था निर्माण होऊ लागली आहे. आजच्या युवा पिढीला कौटुंबिक जबाबदारी सांभाळणे नकोसे वाटू लागले आहे. त्यातून पती पत्नी मधील नाते संपुष्टात येऊन लिव्ह ईन रिलेशनशिप, गर्भपात, या सारख्या प्रकारांना उत्तेजन आणि प्राधान्य मिळू लागले आहे. भविष्यात हे प्रकार अत्यंत घातक रूप घेऊ शकतात, सामाजहिताच्या दृष्टीने मारक होऊ शकतात, असे झत्तू यांनी सांगितले.
कोरोना काळात देशभरात लॉकडाऊनच्या परिणामस्वरूप लोक बंदिस्त बनल्याप्रमाणे घरातच राहू लागले. त्यातून घरगुती हिंसाचार मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. ही व्यवस्था पुन्हा स्थीरस्थावर बनविणे हे आजच्या घडीस देशापुढील मोठे आव्हान बनून राहिले आहे. लोकांना पुन्हा एकदा कुटुंबव्यवस्थेचे महत्व पटवून देण्याची वेळ आली आहे.
त्याच उद्देशाने जमात इ हिंद संघटनेतर्फे ‘सदृढ कुटुंब सदृढ समाज’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रव्यापी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याद्वारे 19 ते 29 फेब्रुवारी या दरम्यान वेबिनार, कोपरा बैठका, स्पर्धा, गटवार चर्चा, यासारख्या विविध माध्यमांद्वारे समाजात जागृती करणे, मानवी नातेसंबंधांची माहिती आणि महत्व पटवून देणे, व त्यायोगे प्रत्येक घरात आनंदी आणि सुखकारक वातावरण निर्माण करणे, यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती श्रीमती बेग यांनी दिली.