सभागृह सुरू करण्यास उशीर केल्याने काँग्रेसच्या सदस्यांनी उठविला आवाज
प्रतिनिधी /बेळगाव
विधानपरिषदेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू होते. त्यानंतर पुन्हा कामकाजाला 3 वाजता सुरू केले जाईल, असे सभापती बसवराज होरट्टी यांनी सांगितले. त्यामुळे सर्व सदस्य भोजन विरामानंतर सभागृहात 3 वाजता आले. मात्र तब्बल दीड तास सभागृह सुरू करण्यास उशीर झाला. त्यामुळे काँग्रेस व निजदचे सर्व सदस्य सभापती बसवराज होरट्टी यांच्या कक्षाकडे गेले. त्यावेळी सत्ताधारी आणि त्यांच्यामध्ये जोरदार वादावादी सुरू झाली. जोरदार बाचाबाची सुरू झाल्याने एकच गोंधळ उडाला. हा आवाज ऐकून सर्वच माध्यमांचे प्रतिनिधी तेथे दाखल झाले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला.
धर्मांतर बंदी विधेयक कोणत्याही परिस्थितीत संमत करून घेण्यासाठी भाजपची व्युहरचना सुरू होती. मात्र काँग्रेसच्या सदस्यांनी हा त्यांचा डाव हाणून पाडल्याचे दिसून आले. एक तर सकाळपासून या विधेयकावर चर्चा करण्याची संमती सभागृहात दर्शविली नाही. यावर सभापतींसह सत्ताधारी पक्षातील सदस्य मूग गिळून गप्प होते. विधानसभेमध्ये धर्मांतर बंदी विधेयक संमत झाले. मात्र विधानपरिषदमध्ये हे विधेयक संमत झाल्यानंतरच तो कायदा होऊ शकतो. त्यामुळे भाजप कोणत्याही परिस्थितीत विधानपरिषदेमध्येही हे विधेयक संमत करण्यासाठी धडपडत होते. त्यासाठी उशिराने सभागृह सुरू करण्याचा डाव करण्यात आला होता. मात्र विरोधकांनी त्यांचा डाव उलटला.
धर्मांतर बंदी विधेयकाला काँग्रेस आणि निजदच्या सदस्यांचा तीव्र विरोध होता. हे विधेयक विधानपरिषदेत संमत होणार नाही, याची कुणकुण भाजपला होती. त्यामुळे त्यांनी सर्व सदस्यांना सभागृहात आधीच बोलावून घेतले होते. त्याचबरोबर त्या विधेयकावर चर्चा न करताच ते विधेयक संमत करून घेण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र विरोधी पक्षनेते एस. आर. पाटील यांनी सभागृहाच्या नियमानुसार काम करावे, अशाप्रकारे टाळाटाळ करणे योग्य नाही. ही लोकशाही नाही. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करा म्हणत त्यांनी भाजपच्या सर्वांनाच धारेवर धरले. त्यामुळे त्यांनी नमते घेत हे विधेयक मांडलेच नाही.