प्रा. तीर्थंकर माणगावे यांचे प्रतिपादन : पाली येथे 21 वे निसर्ग मराठी साहित्य संमेलन उत्साहात : मान्यवरांचा पुरस्कारांनी गौरव
प्रतिनिधी / खानापूर
शोषित, उपेक्षित आणि वंचितांचे जगणे सुसहय़ करण्याचे काम साहित्यातून होते. केवळ कथा-कविता आणि कादंबऱया म्हणजे साहित्य नसून समाजाचं हित जे साधतं तेच खरं साहित्य असतं. माणसा-माणसातली असमानतेची दरी दूर करून माणूस जोडण्याचे काम साहित्यातून होते, असे प्रतिपादन इचलकरंजी येथील साहित्यिक प्रा. तीर्थंकर माणगावे यांनी केले. भीमगडाच्या कुशीतील पाली (ता. खानापूर) येथे आयोजित एकविसाव्या निसर्ग मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले, साहित्याकडे समाजाचा आरसा म्हणून बघितले जाते. समाजाचे प्रतिबिंब त्यात उमटते. समाजातील बऱया-वाईट गोष्टींचे वास्तव चित्रण साहित्यातून व्यक्त होते. समाजाचे मानसिक आणि सांस्कृतिक भरण-पोषण साहित्याच्या माध्यमातून घडून येते. विद्याधन हे सर्वश्रे÷ धन असल्याने रोज नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करावा. मातृभाषेतील शिक्षणाने व्यक्तिमत्त्व बहरते. नैसर्गिक वातावरणात व्यक्तीचा सर्वांगीण विकास घडून येतो. मातृभाषा हा आत्म्याचा हुंकार असतो. त्यामुळे पालकांनी मातृभाषेतून मुलांना शिक्षण दिल्यास सर्वगुण संपन्न व संस्कारक्षम पिढी घडण्यास वेळ लागणार नाही, असे सांगितले.
कर्नाटक विद्यापीठ धारवाडचे निवृत्त मराठी विभाग प्रमुख डॉ. अमृत यार्दी म्हणाले, निसर्गाच्या सहवासात व्यक्तिमत्त्व फुलते. निसर्ग हा माणसाचा शिक्षक आहे. आपल्याला जी गोष्ट निसर्गाला देता येत नाही ती गोष्ट हिरावून घेण्याचा देखील आपल्याला कोणताच अधिकार नाही. निसर्गाच्या सान्निध्यात मानवाला स्वतःच्या मर्यादांची योग्य जाणीव होते. निसर्गासारखा दुसरा मित्र नाही. समाजातील लोकांची सुख-दुःखे समजून घेऊन ती दूर करण्याचा प्रयत्न साहित्यातून झाला पाहिजे.
ग्रामीण साहित्यिक प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध
बेडकिहाळचे प्रा. अजित सगरे म्हणाले, ग्रामीण संमेलनांनी मराठी भाषा समृद्ध बनविणाऱया कष्टकरी शेतकऱयांच्या दारापर्यंत साहित्याचा लौकिक पोहोचविला. लोकसहभाग आणि लोकबळावर गावोगावी सुरू असलेली ही संमेलने मराठीच्या उत्कर्षाची प्रतिके आहेत. उद्घाटक निरंजनसिंह सरदेसाई म्हणाले, खानापूर तालुक्मयातील मराठी अस्मिता जिवंत ठेवण्याचे काम ग्रामीण भागातील लोककलावंत आणि नवोदित साहित्यिकांनी केले आहे. त्यांच्या प्रयत्नांना बळ देण्याचे काम अशी लहान संमेलने करत आहेत. यामुळे ग्रामीण साहित्यिक प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध झाले असून तरुण पिढीने वाचन आणि लेखनाला महत्त्व देण्याचे आवाहन
केले.
यावेळी कर्नाटक विद्यापीठातील निवृत्त इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. आर. एल. जाडर, मनोविज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. सतीश जाधव, डॉ. गोपाल महामुनी यांनी मनोगत व्यक्त केले. मराठा मंडळ महाविद्यालयाचे प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. इन्फोसिसचे वरि÷ तंत्रज्ञ निरंजनसिंह सरदेसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला आशियाई कबड्डी सुवर्णपदक विजेते नितीन मदने, निवृत्त प्राचार्य एस. जी. सोन्नद, शिरोली ग्राम पंचायत अध्यक्षा लक्ष्मी पाटील, उपाध्यक्षा गीता मादार आदी उपस्थित होते.
मराठी विभाग प्रमुख प्रा. आय. एम. गुरव यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.