समाजाप्रती संवेदनशीलता हवी , मूल्यांच्या जपणुकीला प्राधान्य हवे, योग्यवेळी योग्य निर्णय घ्या
मनीषा सुभेदार / बेळगाव
आर्थिक आणि भावनिक स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय? हे समजून घेणे आवश्यक आहे. पैसे खर्च करणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे किंवा सतत डोळय़ांतून पाणी वाहते ठेवणे म्हणजे सुद्धा भावनाशील असणे नव्हे. आर्थिक आणि भावनिक स्वावलंबन समजून घेणे, समाजाप्रती संवेदनशील असायला हवे. सुंदर दिसण्यापेक्षाही मनामध्ये मूल्यांची जपणूक महत्त्वाची आहे, हे मत आहे, डॉ. कीर्ती शिवकुमार यांचे.
एका वेगळय़ाच म्हणजेच औद्योगिक क्षेत्रात प्रवेश करण्याची इच्छा असताना अचानक त्या शिक्षण क्षेत्रात वळल्या आणि मनापासून रमल्या. गेली 22 वर्षे त्या शिक्षण क्षेत्रात असून अनेक महत्त्वाची निरीक्षणे त्या नोंदवतात. त्यांचा पेशा केवळ शिकविण्यापुरता नाही तर त्याला एक सामाजिक जोड आहे.
डॉ. कीर्ती यांचा जन्म शिमोग्याचा. परंतु त्यांचे सर्व शिक्षण बेंगळूर येथे झाले. मथुरा येथील डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठातून त्यांनी पीएचडी पदवी घेतली. मनुष्यबळ विभाग हे त्यांचे विशेष आवडते क्षेत्र होते. तेथेच त्यांना करिअर करायचे होते. तत्पूर्वी सहा वर्षे टाटा सन्सच्या प्रकल्पामध्ये त्या कार्यरत राहिल्या. हा प्रकल्प म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना चाकोरी वातावरणातून बाहेर काढून अर्थार्जनासाठी प्रवृत्त करणे व स्वावलंबी करणे असा होता. पीएचडी पूर्ण करून त्या बेळगावला आल्या. तेव्हा मुलीच्या जन्मामुळे दोन वर्षे त्यांनी विश्रांती घेतली. मात्र आपल्या शिक्षणाचा उपयोग होणे आवश्यक वाटू लागल्याने आरपीडीमध्ये अर्धवेळ प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. या अनुभवाने त्यांना शिक्षण क्षेत्रात रस वाटू लागला आणि त्या शिक्षण क्षेत्राकडे वळल्या.
सध्या त्या आयएमईआरमध्ये कार्यरत असून अनेक जबाबदाऱया सांभाळतात. लेखनाचीही त्यांना आवड असून आलेल्या अनुभवातून विविध उदाहरणे घेऊन त्यांनी आजपर्यंत सात केस स्टडीज लिहिल्या असून 11 शोधनिबंध लिहिले आहेत. या केस स्टडीबद्दल अमिटी बिझनेस स्कूलने त्यांना पुरस्कारही दिला.
व्यवस्थापन हा त्यांचा आवडता विषय असून दिल्ली, मुंबईसह अनेक नामांकित कंपन्यांमधून त्यांनी व्यवस्थापनाचे धडे दिले आहेत. नेतृत्व विकास, संवाद कौशल्य आणि प्रशिक्षकांचे प्रशिक्षण यावर त्यांचा भर आहे. हे काम करतानाच ‘सायबर सुरक्षा’ ‘कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ’ अशा विषयावर त्या आवर्जून कार्यशाळा घेतात.
सायबर सुरक्षा महत्त्वाची
त्या म्हणतात, मी जेव्हा एका कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होते, तेव्हा सुदैवाने सर्व पुरुषांमध्ये एकटी असले तरी सुरक्षित होते. आज ही सुरक्षितता महिलांना मिळतेच असे नाही. त्यामुळे या विषयावर तरुण मुलींना व महिलांना प्रशिक्षित करणे, जागरुक करणे आवश्यक असून सायबर सुरक्षा महत्त्वाची आहे. कारण समाज माध्यमांमधून व्यक्त होताना अनेक मुली जाळय़ात ओढल्या जातात. फेसबुकवरून झालेल्या मैत्रीने एक तरुणी फसवली गेली. हे पाहून या विषयावर जागृती होण्याची गरज आहे, असे त्या म्हणतात.
मुला-मुलींसह पालकांनीसुद्धा वास्तवाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे
एकीकडे महिलांची प्रगती व दुसरीकडे हाथरससारख्या घटना, हे पाहता बलात्कार हे आज राजकीय हत्यार झाले आहे. पीडितेची जात महत्त्वाची नाही तर तिचे शोषण झाले आहे, ही बाब सर्वच घटकांनी गंभीरपणे घ्यायला हवी. समाजाची मानसिकता बदलण्यासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलाला त्याच्या बालपणापासूनच महिलांशी आदराने वागावे हा संस्कार दिला पाहिजे. पुलाखालून खूप पाणी गेले आहे, परंतु अजूनही आपण आपल्या मुलांमध्ये परिवर्तन घडवू शकतो, असा विश्वास त्यांना वाटतो. त्याचवेळी कायद्याने महिलांना संरक्षण दिले आहे. मात्र त्याचा महिलांनी दुरुपयोग करू नये, असे आग्रही मत त्या मांडतात. आपल्या निरीक्षणातून त्या सांगतात की, तरुण-तरुणी बरीच वर्षे एकत्र फिरतात. परंतु नंतर तरुणी मुलावर लैंगिक शोषणाचा आरोप करतात. हे अत्यंत चुकीचे आणि घातकही आहे. त्यामुळे मुला-मुलींनी आणि पालकांनीसुद्धा या वास्तवाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.
आजच्या महिलांना काय सांगाल? या प्रश्नावर त्या म्हणाल्या, माझी आजी मला जे सांगत होती त्याचा मी पुनरुच्चार करते. आपले अस्तित्व गमावून कोणत्याही निर्णयाला बळी पडू नका. तुमच्या निर्णयाची किमान पाच वर्षांनंतर तुम्हाला खंत वाटता कामा नये. तसेच तुमचा एक निर्णय संपूर्ण कुटुंबावर विपरित परिणाम करणारा आहे का? हे आधी तपासून पहा. त्याचबरोबर महिलांनी त्यांना नेमके काय हवे आहे हे तपासायला हवे. त्यांच्या हाती पैसा खेळतो याचा अर्थ त्या स्वतंत्र आहेत असे नव्हे. पैसा असो किंवा भावना असो, योग्यवेळी योग्य निर्णय महत्त्वाचा आहे. हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे, असे डॉ. कीर्ती सांगतात.
शिक्षण हे एक परिवर्तनाचे साधन
मनुष्यबळ विकास हा कीर्ती यांचा आवडता विषय आहे. या विषयावर त्या ठिकठिकाणी व्याख्याने देतात, सल्ला देतात. शिक्षण हे एक परिवर्तनाचे साधन आहे. यावर माझा ठाम विश्वास आहे. आपण फक्त ज्ञान देत नाही तर माणूस घडवितो, असे मला वाटते. शिक्षणाने मला अपार आनंद दिला आहे, असे त्या नमूद करतात. त्यांच्या आजवरच्या कार्याची नोंद घेऊन केएलएस संस्थेने त्यांना ‘बेस्ट वूमन अचिवर’ हा पुरस्कार दिला आहे तर चिकोडीच्या अहिल्याबाई कॉलेजने त्यांना उत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार दिला आहे.