नवी दिल्ली
गेल्या पन्नास दिवसांपासून दिल्लीच्या सीमारेषांवर सुरू असलेले शेतकऱयांचे आंदोलन अजूनही सुरूच आहे. याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत तोडगा काढण्यासाठी ‘समिती’ नियुक्त केली असली तरी त्यांच्यासमोर आपले म्हणणे मांडण्यास शेतकऱयांनी विरोध दर्शवला आहे. त्यातच आता विविध शेतकरी संघटनांनी या समितीतील चारही सदस्यांना हटवून अन्य तटस्थ जाणकारांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. यापूर्वी समितीवर नियुक्त करण्यात आलेले चारही सदस्य नवीन कृषी कायद्यांचे समर्थक असल्याचा दावा शेतकरी संघटनांनी केला आहे.
भारतीय किसान संघटनेचे नेते भूपिंदरसिंग मान यांनी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या तज्ञांच्या समितीचे सदस्यत्व नाकारले आहे. शेतकऱयांच्या विरोधात पाऊल उचलणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मान यांनी काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांचे समर्थन केले होते. शेतकरी संघटनेचे नेते अनिल धनवट आणि कृषीअर्थतज्ञ अशोक गुलाटी यांचाही या समितीमध्ये समावेश आहे.