अमीन मार्ग नाव बदलास तीव्र विरोध, पटेल चौकाबाबत एकही हरकत नाही
सांगली/ प्रतिनिधी
सांगलीचे पहिले आमदार, साहित्यिक, वक्ते, विचारवंत आणि इतिहासकार दिवंगत सय्यद अमीन यांच्या नावाने सांगली महापालिका क्षेत्रातील बदाम चौक ते वेलणकर मंगल कार्यालय या मार्गाचे नाव बदलण्यास अमीर कुटुंबियांसह शहरातील मान्यवर नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. याबाबत महापालिकेकडे नागरिकांनी हरकत दाखल केली आहे. मात्र भारताचे पहिले उपपंतप्रधान लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने असलेल्या पटेल चौक नाव बदलास कोणीही हरकत न घेतल्याने सरदार पटेल यांचे नाव मुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सरदार पटेलांनाही मनपा कारभाराचा फटका !
महापालिका क्षेत्रातील गल्ली, रस्ते, चौकांची जातीवाचक नावे इतिहासजमा होऊन प्रशासनाने ७५ ठिकाणी नावे बदलण्याबाबत नागरिकांकडून हरकती सूचना मागविल्या होत्या. त्याची मुदत सोमवारी संपली. या मुदतीत केवळ एकच हरकत दाखल झाली. माजी आमदार सय्यद अमीन मार्गाचे नाव बदलण्यास नागरिकांनी विरोध केला आहे. अमीन यांनी हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी प्रयत्न केले होते. तसेच त्यांच्या साहित्यातून जातीय सलोखा राखण्याचे कार्य केले आहे. त्यामुळे नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. महापालिका क्षेत्रात तब्बल ७२ वस्त्या व ३ रस्त्यांची नावे बदलली जाणार आहेत. सांगलीतील ४८ वस्त्या, कुपवाडमधील ७, तर मिरजेतील २० वस्त्यांचा समावेश आहे. या वस्त्यांना जातीवाचक नावे आहेत. याशिवाय सांगलीतील पटेल चौक, सय्यद अमीन रोड व हिंदु- मुस्लीम चौक या रस्त्यांची नावेही बदलण्यात येणार आहेत. लोह पुरूष आणि भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभाई पटेल यांच्या सांगली भेटीची स्मृती म्हणून राजवाडा चौकाच्या पुढच्या चौकाला दिलेले पटेल चौक हे नावही महापालिकेच्या विद्वान अधिकाऱ्यांनी जातीय ठरवून वगळायचे ठरवले आहे. दुर्दैव म्हणजे सरदार यांचे नाव वगळु नये म्हणून एकही लेखी हरकत आलेली नाही. सत्ता पक्षात असलेल्या आणि पटेलांवर दावा करणारा काँग्रेस आणि विरोधात असलेला आणि पटेलांचे गुणगान करणारा भाजप दोघांनीही याकडे डोळेझाक केली आहे.
शहरातील बदाम चौक ते वेलणकर कार्यालयापर्यंतच्या रस्त्याला तत्कालीन नगरपालिकेने माजी आमदार सय्यद अमीन मार्ग असे नामकरण केले होते. अमीन यांचे नाव बदलण्याचा प्रकार महापालिकेने करू नये, असे निवेदन नागरिकांच्यावतीने मालमत्ता विभागाला देण्यात आले. निवेदनावर माजी नगराध्यक्ष रामभाऊ घोडके, सिकंदर अमीन, इंजिनिअर विजयकुमार दिवाण, डॉ. नितीन पाटील, डॉ. व्ही. बी. बोराडे, डॉ. अजीज शेख, यशवंत कुंभार पी वाय मुल्ला आदींसह शंभरहून अधिक नागरिकांच्या सह्या आहेत.
जाणून-बुजून कृती ? महापौरांनी खुलासा करण्याची मागणी
दिवंगत सय्यद अमीन यांनी हिंदू-मुस्लिम सांस्कृतिक मिलापासाठी केलेले लेखन, त्यांची अबला ही कादंबरी यांचा शिवाजी विद्यापीठ आणि केंद्र सरकारच्या पातळीवर गौरव झाला आहे. प्राचीन भारतीय संस्कृती हे त्यांचे पुस्तक शिवाजी विद्यापीठात पदवी अभ्यासक्रमासाठी होते. भारतीय शूर स्त्रिया, महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, हजरत मोहम्मद पैगंबर, आदर्श खलिफा डॉ. जाकीर हुसेन, सम्राट अकबर, इस्लाम आणि नीतिशास्त्र, या त्यांच्या ग्रंथसंपदेने मराठी भाषेला समृद्ध केले आहे. अतातुर्क केमाल पाशा हे पुस्तक एम ए अभ्यासक्रमासाठी निवडले गेले होते. अमीन हे संस्कृत पंडित आणि नाना शंकर शेठ स्कॉलरशिपचे विजेते होते. सांगलीच्या नगर वाचनालय याबरोबरच भारतात जेथे जेथे मुस्लिम मराठी साहित्य संमेलन भरवले जाते तेथे सय्यद आमीन यांच्या स्मृती जागवल्या जातात. अशा विद्वान व्यक्तीचे नाव ते राहत असलेल्या परिसराला देऊन नगरपालिकेने त्यांचा मृत्यूपश्चात गौरव केला होता. गेली पन्नास वर्षे नळभागचा हा रस्ता सय्यद अमीन मार्ग म्हणूनच ओळखला जातो. असे असताना महापालिकेत जाणून बुजून असा कोणी प्रस्ताव तर आणला नाही ना? याचा खुलासा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी करावा अशी मागणी नळभाग आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सय्यद अमीन हे सामाजिक सांस्कृतिक साहित्य बरोबरच शिक्षण क्षेत्रात पुणे विद्यापीठात कोर्ट सदस्य होते. ते आंतरराष्ट्रीय लेखक संघ (पेन) चे सदस्य होते. ओघवत्या शैलीतील भाषणासाठी ते राज्यभर प्रसिद्ध होते. असा इतिहास गाजवणार्या व्यक्तीची स्मृतिप्रेरणा पुढच्या पिढीसाठी राखण्याऐवजी त्यांच्या निर्मळ चरित्राला बाधा पोचणारे कृत्य महापालिकेने करू नये. नाव बदलण्याचा घाट रहित करावा. – सिकंदर अमीन दिवंगत सय्यद अमीन यांचे पुत्र