पलुस / प्रतिनिधी
एसटी कामगारांना शासनाच्या सेवेत विलीनीकरण करा अन्यथा शासकीय कामगारांप्रमाणेच सर्व योजना यांना लागू करा. आणि यांच्या पगाराची हमी शासनाने घ्यावी. या मागणीसाठी राज्यातील सर्व कामगार लाखोंच्या संख्येने येत्या १० तारखेला मुंबईच्या मंत्रालयाच्या दारात संसार थाटून राहणार आहे. महाराष्ट्रातील दीडशे पेक्षा जास्त आमदार व लोकप्रतिनिधी या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी उभा असतील. त्यामुळे कारवाईचा बडगा न उगारता सरकारने माणूसकीच्या भावनेतून या कामगारांकडे बघावे असे आवाहन आ. सदाभाऊ खोत यांनी पलुस येथे केले.
सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या एस टी कामगारांच्या कामबंद आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आ. सदाभाऊ खोत यांनी पलुस एसटी डेपो येथे भेट दिली. यावेळी कामगारांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणाला बसलेल्या सामाजिक कार्यकर्ते संग्राम थोरबोले याचे त्यांनी कौतुक केले.