आयएमएची सरकारकडे मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
अठरा वर्षांवरील सर्वांनाच कोरोना नियंत्रण लस दिली जावी, अशी मागणी आयएमएने म्हणजेच भारतीय वैद्यक संघटनेने केली आहे. याबाबत आयएमएने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे.
कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक तीव्र झाल्याने जनमाणसात भीती पसरली आहे. कोरोनापासून संरक्षण म्हणून सरकारने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. मात्र, यामध्ये 18 ते 45 वयोगटाला वगळण्यात आले आहे. परंतु तरुणांनासुद्धा लस दिली जावी, अशी मागणी आयएमएने केली आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. गेल्या तीन दिवसांत दररोज 90 हजार जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. दोन दिवसांपूर्वी देशामध्ये एकूण 1,03,558 जणांना लागण झाली आहे. सध्या केवळ 45 वर्षांवरील व्यक्तींना लस दिली जात आहे. परंतु दुसऱया लाटेची आक्रमकता आणि प्रभाव लक्षात घेता सरकारने लसीकरण योजनेत त्वरित बदल करून युद्धपातळीवर सर्वांनाच लस दिली जावी आणि त्यासाठी फॅमिली क्लिनिक्सना सहभागी करून घ्यावे, अशी मागणी आयएमएने केली आहे.