पुन्हा आदेश जारी :प्रादेशिक आयुक्त’च्या पथकाकडून होणार तपासणी
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील सर्व खात्यांमधील सरकारी अधिकारी, कर्मचारी व इतर कर्मचाऱयांनी कामाच्या वेळेत सक्तीने ओळखपत्र (आयडेंटी कार्ड) वापरावे, असा आदेश राज्य सरकारने पुन्हा जारी केला आहे. यापूर्वी आदेश देऊन सुद्धा अधिकारी, कर्मचारी ओळखपत्र परिधान करत नसल्याने राज्याचे मुख्य सचिव पी. रवीकुमार यांनी नव्याने आदेश दिला आहे.
अलिकडेच राज्य सरकारच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱयांना तसेच सरकारशी संलग्न असणाऱया निगम-महामंडळे, प्राधिकरणांच्या अधिकारी व कर्मचाऱयांना कामाच्या वेळेत सक्तीने ओळखपत्र परिधान करण्यासंबंधीचा आदेश जारी करण्यात आला होता. मात्र, जिल्हा व तालुका पातळीवरील कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचारी ओळखपत्राचा वापर करत नसल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे कार्यालयांमध्ये येणाऱयांना अधिकारी, कर्मचाऱयांची भेट घेणे कठीण होते. त्यामुळे राज्य सरकारी व सरकारच्या कक्षेत येणाऱया संस्थांमधील कर्मचाऱयांना ओळखपत्र वापरण्याची सक्ती करण्यात आली असून प्रादेशिक आयुक्त कार्यालयातील तपासणी पथकाद्वारे ओळखपत्र न वापरणाऱयांचा शोध घेण्याचा आदेश देण्यात आला आहे.
राज्य सरकारचे मुख्य सचिव पी. रवीकुमार यांनी सरकारचे अप्पर मुख्य सचिव, सचिव, सर्व जिल्हाधिकारी, सर्व प्रादेशिक आयुक्तांना यासंबंधी पत्र पाठविले आहे.