श्रीकृष्णाच्या प्रतापांचे वर्णन शतधन्व्याकडे करताना अक्रूर पुढे म्हणाला-सूर, असूर, नर, किन्नर, गंधर्व हे सारेजण इंद्राला आपला राजा मानतात व त्याला वंदन करतात. अशा इंद्राचा जाणून बुजून अपमान करण्याचे धाडस या कृष्णाने बालपणीच केले. कृष्ण बालपणी व्रज प्रदेशात होता. व्रजवासी दरवषी इंद्राला प्रसन्न करून घेण्यासाठी त्याची आराधना करीत. इंद्राच्या कृपेमुळे पाऊस पडतो, त्यामुळे सृष्टी सुजलाम सुफलाम होऊन आपल्या गाई व वासरांना चांगला चारा मिळतो अशी त्यांची भावना होती. पण कृष्णाने त्यांना पटवून दिले की पाऊस इंद्राच्या कृपेने पडत नाही. गोवर्धन पर्वत मेघांना अडवतो व त्यामुळे त्याच्याच कृपेने व्रजप्रदेशात पाऊस पडतो. त्यामुळे आपण इंद्राची आराधना करणारा यज्ञ बंद करून गोवर्धननाथाचीच पूजा करूया. त्याप्रमाणे व्रजवासी लोकांनी इंद्र पूजेचा यज्ञ बंद केला. त्यामुळे इंद्राचा अपमान झाला. त्याला याचा भयंकर राग आला. रागावलेल्या इंद्राने प्रलय मेघांना आज्ञा केली की त्यांनी व्रज प्रदेशावर मुसळधार वर्षाव करावा. सात दिवस रात्र मेघांनी प्रचंड पाऊस व्रजावर पाडला. त्यावेळी या कृष्णाने आपल्या हातावर गोवर्धन पर्वत उचलून धरला व त्याच्याखाली सर्व व्रजवासी लोक व त्यांचे गोधन सुरक्षित राखले. शेवटी इंद्राला या कृष्णाचे महिमान कळले. तो याला शरण आला. अशा पराक्रमी कृष्णाशी कोण अधम वैर करू शकेल?
अकूर म्हणे शतधन्व्यासी । विचार करिसी एकान्तवासी ।
तोही विदित श्रीकृष्णासी । कीं सर्वनिवासी सर्वग तो । तया भगवंताकारणें । नमस्कारितों अनन्यपणें ।
संपन्न असतां जो षड्गुणें । मनुष्याचरणें वर्ततसे ।
कृष्ण म्हणतां गमे बाल । अद्भुत कर्में पाहतां काळ ।
तयाचे पदीं माझें मौळ । कमळीं अळीकुलवत् रंगो ।
ज्यासि नाहीं आदि अंत । देशकालादिपरिच्छेदरहित । संतत शाश्वत विकारातीत । तो अच्युत मी नमितों । होण्याजाण्याहूनि पूर्वीं । यालागि आदिभूत या नांवीं । ज्यातें म्हणती महानुभावी । तत्पदीं ठेवीं मी माथा। जो कूटस्थ सर्वाशयीं । असोनी सज्ज नोहे केंहीं । तया सर्वगा आत्मया पाहीं । वाड्मनदेहीं मम नमन ।
ऐसे शतशः नमस्कार । अक्रूरें करूनि वारंवार ।
वस्त्रे पुसूनि द्रवित नेत्र । स्मरोनि श्रीधर त्राहि म्हणे ।
शतधन्व्यातें म्हणे बापा । मनुष्यदेही कृष्णकृपा ।
न संपादी तो पात्र पापा । आकल्प खेपा न चुकती ।
ऐसा अक्रूरें निराकरितां । शतधन्व्यासि प्रबळ चिंता । वांचावयाची खुंटली आस्था । मग वर्तली कथा ते ऐका ।
अक्रूर शतधन्व्याला पुढे म्हणाला-अरे शतधन्व्या! तू अगदी एकान्तात जो विचार आपल्या मनात करतोस तोही या कृष्णाला ताबडतोब त्याच वेळी कोणत्याही साधनाशिवाय कळतो कारण हा श्रीकृष्ण सर्वव्यापक परमात्मा आहे. तो सर्वकाळ सर्वत्र विद्यमान आहे. त्या कृष्ण परमात्म्याला मी अनन्यभावाने नमस्कार करतो. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य व ऐश्वर्य या सहा गुणांनी मंडीत असलेला हा भगवंत अवतार धारण करून मनुष्याप्रमाणे वर्तन करीत आहे.
Ad देवदत्त परुळेकर