कोरोनाची दाहकता अतिप्रखर, रुग्णसंख्येत नाही उतार : दिवसभरात आतापर्यंतचे सर्वाधिक 951 रुग्ण,.11 जणांचा बळी
प्रतिनिधी / पणजी
सतत वाढणाऱया रुग्णसंख्येत शनिवारी किंचित दिलासा दिलेल्या कोरोनाने रविवारी त्या दिलाश्याचा वचपा काढत रुग्णसंख्या थेट हजाराच्या जवळ नेऊन ठेवली. त्याचबरोबर दुसऱया लाटेतील आतापर्यंतचे सर्वाधिक 11 बळी घेतले आहेत.
रविवारी 24 तासात तब्बल 951 बाधित सापडले असून सक्रिय रुग्णसंख्या 7052 वर पोहोचली आहे. याच दरम्यान 11 जणांचा मृत्यू झाल्यामुळे बळींचा आकडा 883 वर पोहोचला आहे.
आतापर्यंत एकूण 67212 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील 59277 जण बरे झाले आहेत. 24 तासात कोरोनामुक्त झालेल्या 531 जणांचा त्यात समावेश आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण रोज कमी होत असून सध्या ते 88.19 टक्क्यांवर आले आहे. 105 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले आहेत तर 401 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे.
राज्यातील 33 पैकी सर्व आरोग्य केंद्रे हाऊसफुल्ल झाली असून रुग्णसंख्या तीन अंकी आकडय़ावर पोहोचली आहे. केवळ नऊ ठिकाणी दोन अंकी संख्येने रुग्ण आहेत आणि ती संख्यासुद्धा शतकाच्या उंबरठय़ावर पोहोचलेली आहे. पहिल्या लाटेनंतर रुग्णसंख्या शून्यावर पोहोचलेल्या शिरोडा केंद्रातसुद्धा सध्या शंभरपेक्षा जास्त रुग्ण आहेत. गत कित्येक दिवसांपासून मडगाव आरोग्य केंद्र रुग्णसंख्येत आघाडीवर आहे. एवढय़ा प्रचंड गतीने राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. दुसऱया लाटेच्या या दाहकतेमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला असून सर्वत्र भीतीदायक चित्र निर्माण झाले आहे. त्यातून धडधाकट व्यक्तीसुद्धा चिंतेने ग्रासलेल्या दिसू लागल्या आहेत.
24 तासांत पर्वरीत 84, कुठ्ठाळीत 75 रुग्णांची भर
गत कित्येक दिवसांपासून मडगाव आरोग्य केंद्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. सध्या तेथे 777 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. द्वितीय स्थानी पर्वरी केंद्रही कायम असून 24 तासात 84 रुग्णांची भर पडत तेथील रुग्णसंख्या 615 वर पोहोचली आहे. एकूण रुग्णसंख्येच्या बाबतीत तिसऱया स्थानी फोंडा केंद्राने उसळी घेतली असून तेथील रुग्णसंख्या 478 वर पोहोचली आहे. तर एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्येच्या बाबतीत द्वितीय स्थानी कुठ्ठाळी केंद्र आले आहे. 24 तासात तेथे 75 नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. त्याशिवाय वास्कोत 57, कुडचडेत 47, सांखळीत 40, बाळ्ळीत 30 असे नवीन रुग्णांची भरती झाली आहे.
पणजीत सर्वाधिक 64 रुग्ण कोरोनामुक्त
त्याचबरोबर 24 तासात सर्वाधिक रुग्ण बरे होण्याच्या बाबतीत पणजी केंद्र आघाडीवर राहिले आहेत. तेथील 64 रुग्ण बरे झाले आहेत. चिंबल केंद्रात 35, डिचोलीत 32, खोर्लीत 24, सांगेत 12 आणि मयेतील 10 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या कासारवर्णे केंद्रात सर्वात कमी म्हणजे 30 रुग्ण आहेत.
सक्रिय रुग्णांची केंद्रवार संख्या
डिचोली 127, सांखळी 194, पेडणे 158, वाळपई 96, म्हापसा 453, पणजी 444, हळदोणा 137, बेतकी 63, कांदोळी 440, कासारवर्णे 30, कोलवाळ 119, खोर्ली 102, चिंबल 227, शिवोली 177, पर्वरी 615, मये 37, कुडचडे 164, काणकोण 94, मडगाव 777, वास्को 455, बाळ्ळी 101, कासावली 222, चिंचिणी 128, कुठ्ठाळी 457, कुडतरी 101, लोटली 129, मडकई 62, केपे 74, सांगे 59, शिरोडा 103, धारबांदोडा 78, फोंडा 478 व नावेलीत 124 रुग्ण आहेत. त्याशिवाय रेल्वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले 27 बाधित सापडले आहेत.
कोणत्याही खासगी किंवा सार्वजनिक कार्यक्रमात 50 पेक्षा अधिक लोक जमल्यास सरकारकडून लेखी परवानगी घेणे बंधनकारक असेल, असा आदेश सीआरपीसी 144 कलमाखाली सरकारने जारी केला आहे. राज्यात कोविड 19 च्या दुसऱया लाटेने उग्र रुप धारण केले असताना दर दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत तसेच दगावणाऱयांच्या संख्येतही मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनावर आळा घालण्यासाठी हा आदेश जारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यात लग्न समारंभ मोठय़ाप्रमाणात होत आहेत. धार्मिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम मोठय़ाप्रमाणात होत असतानाच यात मोठय़ा संख्येने लोकांची उपस्थिती असते. जमावामुळे कोरोनाचा अधिक फैलाव होण्याची शक्यता असते. कोरानाच्या दुसऱया लाटेने उग्र रुप धारण केले असतानाही अधिकाधिक लोक सरकारने घालून दिलेल्या कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. कार्यक्रमांवरच निर्बंध घालण्याच्या उद्देशाने खासगी तसेच सार्वजनिक कार्यक्रमांवर अटी लागू करण्यात आल्या आहेत. अटींचे पालन न केल्यास आयोजकांवर तसेच ज्या जागेवर कार्यक्रमांचे आयोजन होईल त्या जागेच्या मालकावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
एखादा कार्यक्रम सभागृहात आयोजित केला व त्या सभागृहाची क्षमता 100 लोकांची असल्यास 50 टक्केपेक्षा अधिक लोकांची कार्यक्रमात उपस्थिती असू नये. सभागृहाची क्षमता 100 हून अधिक असल्यास व कार्यक्रमाला 50 हून अधिक लोक येणार तर लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे, असे दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱयांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
एखादा कार्यक्रम मैदानावर असल्यास सदर कार्यक्रमात केवळ 200 लोकांचीच उपस्थिती असावी, असेही आदेशात म्हटले आहे. हा आदेश रविवारपासून लागू केला जाईल. कार्यक्रमाच्या आयोजकांनी कार्यक्रमाच्या दरम्यान सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन होईल याकडे लक्ष देणे बंधकारक राहील. मास्कचा वापर तसेच सामाजिक अंतर राखणे बंधनकारक राहिल, असे आदेशात म्हटले आहे. राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या कार्यक्रमांना सवलत देण्यात आल्याचेही आदेशात म्हटले आहे.
टिका उत्सवात 2,39,062 जणांनी घेतली लस
गोव्यातील टिका उत्सवास (कोरोना प्रतिबंधक लसीकरण) जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असून वाढता संसर्ग, कोरोनाचे वाढते रुग्ण, बळी याच्या भीतीने लस घेण्याचा कल वाढत आहे. लोक लसीकरणासाठी आरोग्य केंद्रावर गर्दी करीत आहेत. टिका उत्सवाच्या नवव्या दिवसापर्यंत 2,39,062 जणांनी कोविड प्रतिबंधक लस घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यातील 1,93,015 जणांनी पहिला डोस घेतला तर 46,047 जणांनी डोस घेतला आहे.
विविध पंचायती, आरोग्य केंद्रात हा टिका उत्सव अर्थात लसीकरण मोहीम चालू असून ती 21 एप्रिलपर्यंत चालणार आहे. 45 वर्षावरील सर्वांना लस देण्याचे ध्येय सरकारने ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सुनावणीसाठी फक्त महत्त्वाचेच खटले
वाढत्या कोरोना संसर्गाचा परिणाम गोवा उच्च न्यायालयाच्या कामकाजावर झाला असून फक्त महत्त्वाची प्रकरणे सुनावणीसाठी घेतली जाणार आहेत. सुनावणीवर काही निर्बंध घालण्यात आले असून फक्त व्हिडिओ कॉन्फरन्समार्फत (व्हीसी) कामकाज होणार आहे. आज सोमवार दि. 19 एप्रिल ते 7 मे पर्यंत फक्त अत्यावश्यक खटलेच सुनावणीसाठी घेण्यात येणार आहेत. त्याची सुनावणी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून न्यायालयाच्या रजिस्ट्रारांनी या संदर्भात सूचना जारी केली आहे. न्यायाधीशांनी खटले वाटून घेतले असून त्यानुसारच कामकाज चालणार आहे. तातडीची नसलेली प्रकरणे मागे ठेवली जाणार असून अतिमहत्त्वाचे खटलेच सुनावणीसाठी घेतले जाणार आहेत.
दहावी-बारावी परीक्षा ऑनलाईन घ्या अन्यथा पुढे ढकला
गोवा बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा प्रत्यक्ष हजेरी लावून (ऑफलाईन) घेण्यास पालक, विद्यार्थी तसेच शिक्षणतज्ञ, पालक शिक्षक संघ यांचा विरोध वाढत असून त्या ऑनलाईन घेण्यासाठी किंवा पुढे ढकलण्यासाठी बोर्डावर दबाव येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणी गंभीरपणे विचार करण्याशिवाय बोर्डासमोर कोणताही पर्याय राहिलेला नाही, अनेक राज्यांनी कोरोना संकटामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंडळाने तर सीबीएसईची दहावी परीक्षा रद्द करून बारावीची परीक्षा पुढे ढकलली आहे. त्याच धर्तीवर गोवा बोर्डाने देखील दहावी-बारावी परीक्षा ऑनलाईन घ्यावी, पुढे ढकलावी या मागणीस पाठिंबा वाढत आहे.