लंडनपेक्षा अधिक गुंतवणूक करत आहेत कंपन्या
दक्षिण भारतातील बेंगळूर हे शहर जगातील सर्वाधिक वेगाने वृद्धिंगत होणारे टेक हब (तंत्रज्ञान क्षेत्राचे मुख्य केंद्र) ठरले आहे. या शहराने लंडन, पॅरिस, म्युनिच आणि बर्लिन यांना पिछाडले आहे. यासंबंधीचे संशोधन लंडनची संस्था डिलरुम डॉट कॉमने केले आहे. या संस्थेच्या अहवालानुसार बेंगळूर शहरात कंपन्या प्रचंड गुंतवणूक करत आहेत. केवळ 5 वर्षांच्या कालावधीत बेंगळूरमधील गुंतवणूक 5 पटीपेक्षा अधिकने वाढली आहे. तर लंडनमध्ये केवळ 3 पट गुंतवणूक वाढली आहे.
मागील 6 वर्षांमध्ये बेंगळूरमध्ये 31 अब्ज डॉलर्सचे स्टार्ट-अप फंडिंग झाले, तर 2115 स्टार्टअपचे क्यवहार झाले आहेत. शहरात एकूण 1152 फंडेड स्टार्टअप्स आहेत. 17 स्टार्टअप यूनिकॉर्न तर 18 स्टार्टअप सूनिकॉर्न आहेत. युनिकॉर्न म्हणजे अशा कंपन्या ज्यांचे बाजारमूल्य 1 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे. तर सूनिकॉर्न म्हणजे अशा कंपन्या ज्या 2022 पर्यंत यूनिकॉर्न ठरू शकतात.
1970 च्या दशकातच दिशा निश्चित
बेंगळूर हे टेक हब ठरण्याची सुरुवात 1970 च्या दशकात झाली. तेव्हा कर्नाटक स्टेट इलेक्ट्रॉनिक्स विकास महामंडळाचे पहिले अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आर.के. बालिगा यांनी दक्षिण बेंगळूरमध्ये 335 एकर जमिनीवर इलेक्ट्रॉनिक सिटी वसविण्याची कल्पना मांडली, त्यांच्या या कल्पनेमुळेच आज तेथे बेंगळूरचे सर्वात मोठे आयटी (माहिती तंत्रज्ञान) हब आहे.
1983 मध्ये इन्फोसिस कंपनी पुण्याहून बेंगळूर शहरात दाखल झाली. या कंपनीने बेंगळूर शहराचा कायापालटच घडविला. सद्यकाळात टाटा कन्सल्टन्सीनंतर इन्फोसिस ही भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. त्यानंतर 2013 मध्ये विप्रो कंपनी बेंगळूर शहरात आली आणि 2015 मध्ये कंपनीचा नफा 7.1 अब्ज डॉलर्सवर पोहोचला.
2017 च्या एका अहवालानुसार बेंगळूरमध्ये 67 हजार आयटी कंपन्या सुरू झाल्या आहेत. यातील 12 हजार कंपन्या अद्याप कार्यरत आहेत. केवळ बेंगळूरमध्ये भारतातील 35 टक्के आयटी तंत्रज्ञ राहतात. म्हणजेच तेथील 84 लाख लोकसंख्येतील 25 लाख लोक केवळ माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरी करत आहेत. आजच्या काळात देशातील प्रत्येक राज्यातील व्यक्ती बेंगळूरमध्ये नोकरी करत असल्याचे दिसून येते.
अत्यंत सहजपणे गवसते गुणवत्ता
बेंगळूरमध्ये आयआयटी, आयआयएम, आयआयएस, एनसीबीएस, एनआयडी, एनआयएफटी यासारख्या दिग्गज शैक्षणिक संस्था आहेत. बेंगळूर शहर टेक हब होण्यामागील सर्वात मोठे कारण हेच आहे. बेंगळूर इनोव्हेशन रिपोर्ट 2019 नुसार तेथे दिल्लीहून पाचपट आणि मुंबईपेक्षा जवळपास दुप्पट अभियांत्रिकीच्या शैक्षणिक संस्था आहेत.
शहरात सहजपणे कुशल तंत्रज्ञान गुणवत्ता मिळते. इन्फोसिस आणि विप्रोने ही बाब सिद्ध करून दाखविली आहे. इन्फोसिस कंपनी उभारणारे नंदन निलेकणी, सुध मूर्ती आणि नारायण मूर्ती सर्वजण बेंगळूरचेच होते. त्यांनी करून दाखविलेली कामगिरी पाहून आणि त्यामुळे आकर्षित होत उर्वरित तंत्रज्ञान कंपन्यांनी बेंगळूरमध्ये धाव घेतली. या कंपन्यांसाठी येथील शैक्षणिक संस्थांनी पूर्वीपासूनच तयारी करून ठेवली होती असे उद्गार बेंगळूरच्या इन्स्टीटय़ूट फॉर सोशल अँड इकॉनॉमिक चेंजचे माजी संचालक डॉ. आर.एस. देशपांडे यांनी काढले आहेत.
ई-कॉमर्स, आयटी कंपन्यांचा मोठा वाटा
बेंगळूरला टेक हबचा मान मिळवून देण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका ई-कॉमर्स कंपन्यांची आहे. एकूण गुंतवणुकीत ई-कॉमर्स स्टार्टअपचा हिस्सा 30.8 टक्के आहे. बेंगळूरमध्ये जमीन, वीज, मनुष्यबळ सर्व काही अत्यंत महाग आहे. पण ई-कॉमर्स, तंत्रज्ञान आणि माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांसाठी हा मोठा मुद्दा नाही, कारण यातील बहुतांश कार्यालये भाडेतत्वावर कार्यरत असतात. त्यांच्यासाठी मोठा खर्च हा कर्मचाऱयांच्या वेतनावरील असतो. पण निर्मिती कंपन्यांसाठी तेथे टिकून राहणे सोपे राहिलेले नाही. पण शहरात ई-कॉमर्स, आयटी आणि संशोधन तसेच विकासाशी संबंधित कंपन्या आणखीन वेगाने वृद्धिंगत होत राहणार असल्याचे उद्गार अमेझॉनची वेंडर कंपनी बीअँडबी ट्रिपलवॉल कंटेनर्स लिमिटेडचे अध्यक्ष मनीष गुप्ता यांनी काढले आहेत.
वर्षभर उत्तम हवामान
बेंगळूरचे सरासरी कमाल तापमान 30 अंश आणि किमान तापमान 10.6 अंश सेल्सिअस असते. 2020 मध्ये येथील कमाल तापमान 33.6 अंश होते, तर किमान तापना 5.8 अंश राहिले होते. बेंगळूरमधील चांगले हवामान आणि स्वच्छ शहराने लोकांना येथेच स्थायिक होण्यासाठी आकर्षित केले आहे. मागील काही वर्षांमध्ये राहणीमानालाही लोकांनी प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. याचमुळे स्टार्टअपसाठी आता हे पसंतीचे ठिकाण ठरल्याचे उद्गार डॉ. आर.एस. देशपांडे यांनी काढले आहेत. बेंगळूरमध्येच लहानाचे मोठे झालेले मनीष गुप्ता स्वतःच्या बालपणाचीही आठवण काढतात. 1970 च्या दशकात 7 वर्षे असताना या शहरात आलो तेव्हा घरात पंखे नसायचे. बेंगळूरचे हवामान अत्यंत चांगले असायचे आणि याला उद्यानांचे शहर म्हटले जायचे असे गुप्ता सांगतात.
आणखीन 15 वर्षे राहणार वेग
2020 मध्ये झालेल्या एकूण 924 स्टार्टअप कंपन्यांचे विलीनीकरण आणि अधिग्रहणात 333 व्यवहार केवळ बेंगळूरमध्ये झाले आहेत. हा वेग आताच थांबणारा नाही. एका अहवालानुसार 2035 पर्यंत बेंगळूरचा जीडीपी 8.5 टक्क्यांच्या सरासरी दराने वाढणार आहे.
जगातील सर्वात वेगाने वाढणारे आयटी हब बेंगळूर
31 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
2215 स्टार्टअप व्यवहार
1152 अर्थसहाय्यप्राप्त स्टार्टअप
17 स्टार्टअप यूनिकॉर्न
18 स्टार्टअप सूनिकॉर्न
आकडेवारी 2014 ते 2020 पर्यंतची आहे.
बेंगळूरमध्ये ई-कॉमर्समध्ये सर्वाधिक गुंतवणूक
ई-कॉमर्स 30.8 टक्के
ट्रान्सपोर्ट टेक 15 टक्के
फिनटेक 12.1 टक्के
कंझ्युमर सर्व्हिस 11.9 टक्के
ऍडटेक 7.3 टक्के
एंटरप्राइज टेक 6.5 टक्के
अन्य क्षेत्रे 16.3 टक्के
आकडेवारी 2014 ते 2020 दरम्यानची आहे.
स्टार्टअप्स व्यवहारांमध्ये बेंगळूर आघाडीवर
333 बेंगळूर
35 चेन्नई
244 दिल्ली-एनसीआर
183 मुंबई
25 हैदराबाद
31 पुणे
2020 मध्ये भारतात एकूण 924 स्टार्टअप कंपन्यांचे विलीनीकरण आणि अधिग्रहण झाले. यात 333 व्यवहारांसह बेंगळूर आघाडीवर आहे.
पुढील 15 वर्षांपर्यंत कायम राहणार बेंगळूरचा वेग
8.50 टक्के बेंगळूर
7.60 टक्के ढाका
6.60 टक्के मुंबई
6.50 टक्के दिल्ली
2.80 टक्के जगाची सरासरी
2020 ते 2035 पर्यंत बेंगळूरचा जीडीपी 8.5 टक्क्यांच्या दराने वाढण्याचा अनुमान आहे. ही भारतीय उपखंडातील सर्वात वेगवान वृद्धी असणार आहे.
वास्तव्यासाठी सर्वोत्तम शहर
बेंगळूर हे शहर अलिकडेच वास्तव्यासाठी देशातील सर्वोत्तम शहर ठरले आहे. राष्ट्रीय सर्वेक्षणात वास्तव्यसुविधांच्या दृष्टीने हे शहर सर्वात चांगले ठरले आहे. माहिती-तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या या शहरात आता नागरी सुविधाही वेगाने विकसित होऊ लागल्या आहेत.