प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी एपीएमसी भाजी मार्केट बंद करून सुरू करण्यात आलेली तात्पुरती स्थलांतरित भाजी मार्केट शनिवारपासून सोमवारपर्यंत तीन दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱयांची मोठी गैरसोय होणार आहे. आधीच लॉकडाऊनमुळे भाजीपाला उत्पादक अडचणीत सापडले आहेत. भाजीपाला शिवारात पडून आहे. त्यातच स्थलांतरित भाजीमार्केटदेखील तीन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याने भाजीपाला विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग झपाटय़ाने वाढत असल्याने प्रशासनाने शहरात शनिवारी सकाळी 6 ते सोमवार दि. 24 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन जारी केला आहे. याकाळात केवळ अत्यावश्यक गोष्टी वगळता सर्व बंद राहणार आहे. दरम्यान तात्पुरत्या स्वरूपातील स्थलांतरित भाजीमार्केटदेखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात शेतकऱयांचा भाजीपाला सुरळीत विक्री व्हावा, याकरिता शहरातील सीपीएड् मैदान, हिंडाल्को व ऑटोनगर या तीन ठिकाणी तात्पुरती स्वरूपात स्थलांतरित भाजीमार्केटची निर्मिती करण्यात आली आहे. याठिकाणी गाळे उभारून भाजीची खरेदी-विक्री होत आहे. मात्र कडक लॉकडाऊनमुळे स्थलांतरित भाजीमार्केटही बंद राहणार असल्याने भाजी उत्पादक शेतकऱयांची गैरसोय होणार आहे.
एपीएमसीतर्फे आवाहन
सरकारने दि. 22 मे ते सोमवार दि. 24 मे च्या सकाळपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावच्या मुख्य बाजारपेठेसह शहरातील सर्व भाजीमार्केट पूर्णतः बंद राहणार आहेत. बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. शेतकरी, दलाल, हमाल, व्यापारी या सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही समितीने केले आहे.