वृत्तसंस्था/ मुरादाबाद
हिंदू इतिहास, धर्म आणि संस्कृतीचे रक्षण हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख कार्य आहे. भारतीयांचे पूर्वज हिंदू असल्याने सर्व देशवासीय हिंदू आहेत, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये संघ शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी भागवत म्हणाले, संघाचा राजकारणाशी संबंध नाही. देशाची संस्कृती, नैतिकता आणि मानवतेच्या मूल्यांवर आधारित कार्यरत असणारी ही संस्था आहे. देशातील 130 कोटी जनतेसाठी आम्ही कार्यरत आहोत. कोणत्याही निवडणुका व राजकारणाशी आमचा संबंध नाही. आम्ही केंद्र सरकारचे ‘रिमोट कंट्रोल’ म्हणूनही काम करत नाही, असा दावाही त्यांनी केला.
अनेक समाजसुधारक आणि उच्चविद्याविभूषित संघामध्ये थेट कार्यरत नाहीत; पण त्यांनी आमची विचारसरणी अवलंबली आहे. हेच आमच्या कार्याचे यश आहे. जर तुम्हाला तुमची विचारसरणी अधिक व्यापक करायची असेल तर सत्ता काबीज करणे अनिवार्य असते. सत्तेबरोबर बुद्धी आणि परमार्थ निष्ठा असणे आवश्यक आहे, असा स्वामी विवेकानंदाचा विश्वास होता, असेही त्यांनी नमूद केले. आज जगात अमेरिका, रशिया आणि चीन हे विकसित देशच नवीन समस्या निर्माण करीत आहेत. अलीकडे तर अमेरिकेने आपली प्रतिष्ठाही गमावली आहे, असेही ते म्हणाले.
संघाची स्थापना 1925 मध्ये झाली. काही मोजक्या लोकांसह सुरू झालेल्या संस्थेच्या आज देशात 1 लाख 30 हजार शाखा आहेत. व्यक्तिगत स्वार्थ सोडून देशसेवेची इच्छा असणाऱयांचे संस्थेचे स्वागत आहे. त्यांनी राष्ट्र उभारणीसाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. अनेक देशाचे घोषवाक्य हे ‘विविधतेसाठी एकता’ असे आहे; पण भारताचे घोषवाक्य हे ‘विविधतेतून एकता’ असे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
मथुरा आणि काशीमधील मंदिर उभारणी आमचा अजेंडा नाही
मथुरा आणि काशीमधील मंदिर उभारणी हा संघाचा अजेंडा नाही. आम्ही केवळ अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठीच्या ट्रस्टसाठी आग्रही आहोत. हा ट्रस्टच मंदिर उभारणीबाबतचे सर्व निर्णय घेईल, असेही भागवत यांनी स्पष्ट केले.
लोकसंख्या नियंत्रणासाठी सर्व धर्मियांना समान कायदा हवा
भारत हा विकसित देश आहे. अनियंत्रित वाढती लोकसंख्या देशाच्या विकासासाठी योग्य नाही. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वधर्मीयांसाठी देशात एकच कायदा हवा. ‘दोन अपत्य’ या योजनेच्या अंमलबजावणीसाठी संघ आग्रही राहणार आहे. काही विशिष्ट धर्मांना यामध्ये सवलत नको. सरकारने याबाबतचा कायदा लवकरच आणणे ही काळाची गरज आहे, असे भागवत यांनी यावेळी स्पष्ट केले.