एक काळ असा होता ‘़सहकार’ हा महाराष्ट्रात परवलीचा शब्द होता. सहकार वा सहकार्य ही मानवी प्रवृत्ती आहे. ‘विना सहकार नही उद्धार किंवा एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ’ असे घोषवाक्य घेऊन वेगाने वाढलेला आणि लोकप्रिय झालेला सहकार अधिक समृद्ध व्हावा. सहकार विचारांचे जागरण व्हावे यासाठी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीपासून म्हणजे 14 नोव्हेंबरपासून सात दिवस अर्थात 20 नोव्हेंबरपर्यंत राष्ट्रीय सहकार सप्ताह साजरा केला जातो. समृद्धी, समानता, विकास, सहकार्य, पावित्र्य अशा गुणांचे प्रतीक असलेला सहकाराचा सप्तरंगी ध्वज उंंचावला जातो आणि सहकार क्षेत्र आत्मपरीक्षण करुन नवीन दिशा, नवी उद्दिष्टय़े घेऊन अवघ्या समाजकल्याणाचा भावनेने झेपावत असते. सहकार सप्ताहाचा तोच हेतू व उद्देश असतो. यंदाही सहकार सप्ताह देशभर आणि महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात साजरा झाला. लहान-मोठे कार्यक्रम झाले आणि नवी स्वप्ने, नवी उद्दिष्टय़े आणि जुना पारंपरिक भाव-भावना यांचा संदर्भ ठेवून वाटचाल करण्याचा संकल्प करण्यात आला. देशभर पंडित नेहरुंच्या जयंतीपासून सहकार सप्ताह होत असला तर महाराष्ट्रात वसंतदादा पाटील यांच्या जयंतीदिनापासून म्हणजे 13 नोव्हेंबरपासून सहकाराचा बिगूल वाजू लागतो आणि सहकारी संस्था सहकार गीत गाऊ लागतात. वसंतदादा पाटील असोत तात्यासाहेब कोरे असोत, पद्मश्री विखे-पाटील असोत रत्नाप्पाणा कुंभार असोत किंवा धनंजयराव गाडगीळ या सर्वानी सहकाराचा पाया घातला. यशवंतराव चव्हाणांनी त्यास प्रोत्साहन दिले. देशातला पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगरला पद्मश्री विखे-पाटील यांनी काढला तर पहिली सहकारी सोसायटी गदगला निघाली. 1960 साली सहकार कायदा अस्तित्वात आला. आणि सहकार हा महाराष्ट्राचा श्वास बनला. पतसंस्था, सोसायटय़ा, दूधसंघ, गृहनिर्माण संस्था, बँका, जिल्हा बँका, सूतगिरण्या सहकार फोफावत गेला. महाराष्ट्र, गुजरात ही राज्ये सहकारात आघाडीवर राहिली पण इतर राज्यातही सहकाराने मुळ धरले. दुधापासून-खतापर्यंत आणि साखरेपासून सूतापर्यंत सर्व गोष्टी सहकारात निर्माण होऊ लागल्या. सावकारी शोषणातून अनेकांची मुक्तता झाली. सहकार जसा वाढला, फोफावला तशी सहकार लॉबी आकाराला आली. साखरसम्राट, सहकार सम्राट यांचा उदय झाला. सर्वसामान्यांनी भांडवल जमा करुन स्थापन केलेल्या सहकारी संस्था नेत्यांच्या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. सहकारातून राजकारण आणि राजकारणातून स्वार्थ असे नवे समीकरण उदयाला आले. सहकारी संस्था स्थापन करणारे मूळ नेते काळाच्या ओघात मागे पडले आणि त्यांचे वारसदार सहकाराचे शोषण करु लागले. ओघाने सहकार म्हणजे स्वाहाकार असे स्वरुप आले. सहकारात काम करणारे सारेच वाईट प्रवृत्तीचे नव्हते किंवा स्वाहाकार करणारे नव्हते. पण 1990 नंतर ज्या आर्थिक सुधारणा सुरु झाल्या. संपर्क क्रांती झाली. संगणक क्रांती झाली. खासगीकरणाला वेग आला. त्याकाळात अनेक पतसंस्था बुडाल्या. अनेक बँकांनी सामान्यांची आयुष्यभराची पुंजी हिसकावून घेतली. अनेकांचे संसार उघडय़ावर आले, नोकऱया गेल्या. राज्य बँकही त्यात मागे राहिली नाही. सूतगिरण्या, तेलगिरण्या, दूध सोसायटय़ा, पतसंस्था यांची मलई खाण्याची सहकार सम्राटांना सवय लागली आणि सहकार अडचणीत येऊ लागला. चौकशा, लेखापरिक्षणे, कारवाया, नियम यातील फोलपणाही स्पष्ट झाला. सारी संघटित गुन्हेगारी अनेकांनी हात धुवून घेतले आणि याच सम्राटांनी हाच पैसा वापरुन या सहकारी संस्था खासगी केल्या. नातेवाईकांच्या नावावर केल्या.काटामारी सारखी भ्रष्टाचाराची नवी कुरणे उदयास आणली. पण सम्राट व त्यांचे बगलबच्चे सत्तेच्या सावलीत बसून आपली भूक भागवत होते. आता ईडी वगैरे चौकशी सुरु आहे. सारे एकाच माळेचे. या लाटेतही काही चांगल्या संस्था, बँका, सोसायटय़ा टिकून आहेत. या चांगल्या संस्थांचे विश्वस्त खरे विश्वस्त बनून कार्यरत आहेत ओघाने याच संस्था सहकाराचा झेंडा उंचावत आहेत. गेले अठरा महिने कोरोनाचे संकट घोंगावते आहे. या काळात अवघ्या जगाला फटके बसले. त्यात सहकाराला व सहकारी संस्थांनाही फटके बसले. आता या वावटळातही सहकाराचा नंदादीप तेवत ठेवणाऱया संस्थांना ताकद दिली पाहिजे आणि खुलेकरण, खासगीकरण होत असतानाही सर्वसामान्यांना सेवा, शक्ती, विश्वास देणारा सहकार कसा जपता येईल यासाठी पावले टाकली पाहिजेत. आजवर देशाच्या अर्थव्यवस्थेत किंवा मंत्रिमंडळात सहकाराला फार मोजले गेले नाही. अर्थमंत्र्यांच्या बजेट स्पीचमध्ये सहकार हा शब्दही नसे. पण आता मोदी सरकारने केंद्रात सहकार खाते निर्माण केले असून या खात्याला कारभार अमित शहा यांच्याकडे सोपवला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने आता खासगीकरण, डिजीटायझेशन व सोशल मीडियाच्या जमान्यात अधिक कठोर व तप्तर होत चांगल्या सहकारी संस्थांची पाठराखण केली पाहिजे आणि सहकारातील जी मंडळी चोर आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. ग्लोबलायझेशन, डिजीटायझेशनच्या जमान्यात नवे तंत्र, नवा मंत्र घेत नव्या गरजा लक्षात घेऊन लोकहिताची लोकमान्य पावले उचलली पाहिजेत. सहकार गीत आळवण्यापेक्षा सहकारगीत अनुसरले पाहिजे. सहकार सप्ताह समाप्तीचा तोच संदेश आहे. कोरोनानंतर अनेक क्षेत्रात नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. गुंतवणुकीच्या व बचतीच्या दिशाही बदलत आहेत. तंत्रज्ञान विकसित होत आहे. देशाच्या युवापिढीने सहकाराच्या मूळ भावभावना, नियम-कायदे लक्षात घेऊन या नव्या तंत्रात, सहकारात काय करण्याची गरज आहे, भांडवलशाही, सावकारशाही यातून सर्वसामान्यांचे जीवन समृद्ध, संपन्न करण्यासाठी नव्या ध्येयाने नवी उद्दिष्टय़े घेऊन कार्यरत झाले पाहिजे.
Previous Articleदेव मनातील शुद्ध भावाशिवाय कोणत्याही गोष्टीला किंमत देत नाही
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.