पंतप्रधान मोदीजींनी 2018 मध्ये ‘पोषण मास अभियान’ सुरू केले. दरवषी 1 ते 30 सप्टेंबर हा राष्ट्रीय पोषण मास म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय परिवार स्वास्थ्य सर्वेक्षणानुसार भारतातील मुलांची उंची कमी असून मुलांचे वजन उंचीच्या मानाने कमी आहे. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्याच्या हेतूने हे पोषण अभियान सुरू केले. समृद्ध व उज्ज्वल राष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोषण महत्त्वाचे असून, कुपोषणमुक्त भारत करण्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहून योगदान देणे महत्त्वाचे वाटते. योग्य पोषणाने मुले व महिलांचे आरोग्य सुधारेल, म्हणूनच अनेक रेसिपी स्पर्धा घेतल्या जातात. हेल्दी रेसिपी, न्यूट्रिशियस डिशेस सध्या जंक फूड कल्चरमध्ये महत्त्वाचे वाटते. पोषण ही अत्यंत महत्त्वाची आरोग्यमय जीवन जगण्यासाठीची गरज आहे. लोकांना स्वास्थ्य व समृद्धीच्यादृष्टीने जागरूक करून परिपूर्ण आहार ही संकल्पना वाढवून कमी वयातच यांचा प्रचार सुरू करून सुदृढ, सक्षम, उज्ज्वल भारताच्या दिशेने वाटचाल करणे सयुक्तिक ठरेल.
आपल्या प्रमुख गरजांपैकी एक म्हणजे आहार. शरीराची वाढ होणे, झीज भरून काढणे, ऊर्जानिर्मिती, कार्यशक्ती याबाबी शरीराने उपयोग केलेल्या अन्नामुळे होतात. त्यामुळे आहारात घेतलेले अन्न पोषकदृष्टय़ा समतोल हवे. शरीर पोषण व संवर्धन यासाठी प्रथिने, पाणी, जीवनसत्त्वे, खनिज द्रव्ये, कार्बोदके व फॅट यांचा आवश्यक तेवढा पुरवठा व त्याचे योग्य प्रमाण आहारात पाहिजे.
राष्ट्रीय पोषण अभियानाचे उद्दिष्ट लहान मुले, गर्भवती महिला, तरुण वर्ग यांच्यासाठी पोषक आहार देणे व त्यांच्यामधील कुपोषण, ऍनिमिया संपवून 2022 पर्यंत भारताला कुपोषणमुक्त बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे व त्यासाठी पोषण तत्त्वयुक्त अनेक झाडे लावून पोषण वाटिका तयार करणे. मुलांच्या जन्माच्या सुरुवातीच्या हजार दिवसांमध्ये चांगल्या पोषणासाठी स्तनपानाचे महत्त्व सांगितले जाऊन जनजागृती करणे, त्यामुळे बालमृत्यू उपजत मृत्यू, कुपोषण टाळता येईल.
महिला व मुलांमधील रक्ताची कमी दूर करण्यासाठीच्या उपायांवर लक्ष दिले गेले पाहिजे. हिमोग्लोबिनमुळे संपूर्ण शरीराला ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित होतो. थोडक्मयात पोषण अभियानाचा महत्त्वपूर्ण हिस्सा म्हणजे कुपोषित मुले गंभीर न होऊ देता लवकर ओळखून त्यांच्यावर उपचार सुरू करणे व गुंतागुंत टाळून आरोग्यमय जीवन देणे. या सर्व अभियानामध्ये महिला बाल विकास प्रकल्पाअंतर्गत पंचायत प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, शाळा, प्रबंधन समिती, अनेक प्रसार माध्यमे आपले योगदान देत आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचे गर्भवतीचे पोषण आहे. तिचा योग्य आहार हा गर्भाचे उत्तम पोषण करेल व जन्मानंतर बाळाचे वजन चांगले असेल. म्हणून गर्भवतीच्या आहारामध्ये स्निग्ध पदार्थ 30 ग्रॅम, कॅल्शियम 1200 मिलिग्रॅम, सोडियम 1200 मिलिग्रॅम, कार्बोहायडेट 500 ग्रॅम, प्रोटीन 78 ग्रॅम, लोह 35 मिलिग्रॅम असावे. तसेच अन्न हलके, ताजे, पचेल असे षडरसात्मक असावे. स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. योग्य वयात लग्न, बाळंतपण वयाच्या वीस वर्षानंतर, गरोदरपणात आईची काळजी, सकस आहार, विश्रांती, योग्य औषधोपचार व तज्ञांच्या देखरेखीखाली दवाखान्यात प्रसूती यामुळे गर्भवती महिलांमधील कुपोषण टाळता येईल.
बाळाच्या जन्मानंतर आईचे चिकाचे दूध लवकरात लवकर बाळाला दिले गेले पाहिजे. हे बाळाचे पहिले लसीकरण आहे. त्यायोगे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत होते. सहा महिने केवळ स्तनपान करून सहा महिन्यानंतर बाळाला वरचे ताजे अन्न दर दोन तासांनी किंवा मागणीनुसार द्यावे. यात भाताची पेज, डाळीचे पाणी तूप घालून, नाचणी बटाटा रताळे लाल भोपळा हळूहळू एक-एक अन्नपदार्थ वाढवत संपूर्ण अन्न दिले पाहिजे. तसे न केल्यास बाळाचे हिमोग्लोबिन कमी होऊ शकते आणि त्यायोगे सर्व अवयवांना ऑक्सिजन पुरवठा कमी प्रमाणात झाल्याने बाळाला थकवा येऊ शकतो, चिडचिडेपणा वाढतो, विकास व वाढ मंदगतीने होऊ शकते. म्हणून वरच्या आहाराकडे 6 महिन्यानंतर लक्ष दिले तर मुलांचे कुपोषण होणार नाही.
आवश्यक पोषकद्रव्ये
कर्बोदके-शरीराच्या विविध कार्यासाठी ऊर्जा देण्याचे कार्य करतात. जास्त प्रमाणात सेवन केल्यास लठ्ठपणा येतो व कमी केल्यास अशक्तपणा येतो. तृणधान्य, बटाटे, रताळे, गूळ, साखर, मध, गहू, बाजरी, मका, तांदूळ, ज्वारी, साबुदाणा इ. मधून मिळते. प्रथिने-स्नायूंच्या बळकटीसाठी व शरीराच्या वाढीसाठी प्रथिनांची आवश्यकता अधिक असते. ती डाळी, कडधान्य, मांस, अंडी यातून मिळतात.
जीवनसत्त्वे-प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, हार्मोन्स आणि एन्झाइम्सच्या विकासासाठी सर्व प्रकारच्या हिरव्या भाज्या व फळे यातून आवश्यक जीवनसत्त्वे आपणास मिळतात. खनिजे-लोह, कॅल्शियम ही खनिजे मानवाच्या वाढीसाठी सहाय्य करतात. लोहामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत होते. कॅल्शिअम हाडांच्या व दातांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. ते आपणास सुका मेवा, गूळ इत्यादीमधून मिळते. जीवनसत्त्वांच्या अभावामुळे आपल्या शरीरावर अनेक परिणाम दिसून येतात. ‘अ’ जीवनसत्त्व कमी असल्यास रातांधळेपणा येतो. म्हणूनच बाळ 5 वर्षांचे होईपर्यंत दर 6 महिन्यांनी जीवनसत्त्वाचा डोस द्यावा. हिरव्या पालेभाज्या, शेवग्याचा पाला, कोथिंबीर, पालक, गाजर, टोमॅटो, पपई, आंबा, भोपळा यांचा आहारात समावेश करावा. ‘ड’ जीवनसत्त्व कमी असल्यास हाडे ठिसूळ होतात. मुडदूस म्हणजे ज्यात कपाळ मोठे, घाम जास्त, बाळाची शारीरिक वाढ होत नाही, सांधे सुजल्यासारखे, बाळ वर्षाचे होऊन गेले तरी उभे राहू शकत नाही, त्याचे चालण्याचे वय लांबते, छातीच्या फासळय़ा व पायांना बाक येतो, पोट मोठे दिसते. अशावेळी दूध, कोवळय़ा उन्हात बसणे, ‘ड’ जीवनसत्त्वाची पुडी दुधातून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणे आवश्यक वाटते. सतत तोंड येणे, गालावर चट्टे येणे ओठांच्या कडा चिरणे ही लक्षणे ‘ब’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे दिसतात. हिरव्या भाज्या, मूग, मटकी, हरभरा, दूध यात हे मिळते. तांदूळ, गहू यांच्या बाहेरील आवरणात ब जीवनसत्त्व अधिक असते. कोंडा काढला व तांदूळ खूप धुऊन घेतले तर ते निघून जाते. बऱयाचदा मी तांदळाचे धुवण प्यायला सांगते. ‘क’ जीवनसत्त्व कमी असल्याने रोगप्रतिकारकशक्ती कमी पडते. अनिमियाची लक्षणे दिसू लागतात. रक्तवाढीसाठी क जीवनसत्त्व व प्रथिनांची गरज पडते. त्याच्या अभावामुळे हाडांना सूज येते, हाडे दुखू लागतात, बाळाला हात लावला तरी बाळ रडू लागते. उचलून घेण्याचा प्रयत्न केला तरी रडते, छातीच्या फासळय़ा दुखतात, सांधे दुखतात, हिरडय़ा सुजतात, रक्त येते. यामध्ये आवळा, लिंबू पेरू, संत्रे, मोसंबी, टोमॅटो फायद्याचे ठरतात. जन्मानंतर बाळाला 6 महिने पुरेल इतके लोह असते त्यामुळे गर्भवतीच्या लोहाकडे लक्ष देणे आवश्यक असते. नंतर 6 महिन्यांनी बाळाला वरचे पोषक अन्न सुरू केले नाही तर लोह कमी व्हायला लागते, बाळ माती खायला सुरुवात करते, भूक मंदावते, चेहरा निस्तेज होतो, नखांवर पांढरेपणा जाणवतो, त्यामुळे बाळ वरचेवर आजारी पडते.
उज्ज्वल भारताच्या सुदृढ पिढीसाठी पोषणाचे महत्त्व अधिक असल्याने आईला शिक्षित करणे, मुलांच्या व गर्भवतीच्या आहाराची काळजी घेणे, किशोरवयातील मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पोषण अभियानाअंतर्गत शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक स्वास्थ्याचीही काळजी घेतली जाते. योगाभ्यासाचे महत्त्व पटवून देण्यात येते.
चला तर मग सर्वजण मिळून हा आपला सांस्कृतिक वारसा जपत भारतीय आहार परंपरेला जवळ करूया. त्याचे जतन व संवर्धन करून आरोग्य जपूया. राष्ट्रीय पोषण अभियानात सहभागी होऊया. ही देशव्यापी लोकचळवळ बनवूया. या चळवळीमुळे माझे देशबांधव, भगिनी व बालके निरोगी सुदृढ होऊन पूर्ण क्षमता प्राप्त करतील ही प्रतिज्ञा करूया. सही पोषण देश रोशन!
-डॉ. वैशाली लोढा, आयुर्वेदाचार्य, पुणे