अग्नीशामक दलाच्या सर्तकतेमुळे दुर्घटना टळली
प्रतिनिधी /वास्को
सांकवाळ ते वेर्णा महामार्गाच्या बाजुला करडाला लागलेल्या आगीने धोका निर्माण केला. करडाला आग लागलेल्या ठिकाणी भुमीगत गॅस वाहिनी होती. आगीची झळ खोलवर बसल्याने तीही जळाली. त्यामुळे गॅसनेही पेट घेतला. मात्र, अग्नीशामक दलाने त्वरीत धावपळ करून आग विझवीली. संबंधीत कंपनीनेही त्वरीत गॅस पुरवठा बंद करून धोका टाळला. मात्र, या घटनेने गॅस वाहिनीच्या सुरक्षेकडे निष्काळजीपणा झाल्याचे नजरेस आलेले आहे.
वास्को परीसरात तसेच दाबोळी, संकवाळ, वेर्णा या भागात करडाला आग लागण्याचे प्रकार बऱयाच घडत असतात. त्यामुळे वास्को व वेर्णातील शासकीय अग्नीशामक दलाला बरीच धावपळ करावी लागत असते. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास अशाच प्रकारची एक घटना सांकवाळ ते वेर्णा महामार्गावरील मेटा स्ट्रिप कंपनी ते ब्लु बेरी या हॉलच्या दरम्यान महामार्गाच्या बाजुलाच घडली. वेर्णातील अग्नीशामक दलाला ही माहिती मिळताच रोजच्या प्रमाणे घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी करडाला लागलेली आग विझवीण्यास प्रारंभ केला .बऱयाच दूरवर ही आग पसरलेली होती. मात्र, ही आग विझवीतानाच एका ठिकाणी बुडबुडे येत असल्याचे व आग अधिकच भडकत असल्याचे नजरेस आल्याने अग्नीशामक दलालाही धक्का बसला. त्या ठिकाणी भुमीगत गॅस वाहिनी असल्याची कल्पना त्यांना आली. त्यामुळे त्यांनी संबंधीत कंपनी इंडियन ऑईल अदानी कंपनीच्या अधिकाऱयांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यामुळे अधिकाऱयांनी गॅस पुरवठा त्वरीत बंद केला. पुरवठा बंद झाल्यानंतर काही वेळाने दलाने फोमचा वापर करून आग पूर्णपणे निकामी केली. त्यामुळे दुर्घटना टळली. सदर कंपनीच्या पथकाने जळालेली वाहिनीही बदलण्याचे काम त्वरीत हाती घेतले. दरम्यान, मुरगांवचे नगरसेवक सुदेश भोसले यांनी या निष्काळजीपणा संबंधी कंपनी विरुद्ध पोलीस तक्रार केली आहे.
दुर्घटना टळली मात्र, निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघड
करडाला आग लागून झळ बसलेली गॅस वाहिनी वेर्णा औद्योगिक वसाहतीत जाते. ती वाहिनी प्लास्टीक असल्याने आगीची झळ तीला बसली. त्यातून नैसर्गीक वायु बाहेर पडू लागल्यानेच धोका निर्माण झाला. ज्या जमीनीखाली ज्वालाग्रही पदार्थ वाहून नेणारी वाहिनी आहे, त्या ठिकाणची जमीन कोणत्याही धोक्यापासून सुरक्षीत असायला हवी. त्या वाहिनीच्या जमीनीवर कोणतीही अतिक्रमण किंवा झाडे झुडपे, पालापाचोळा, करड निर्माण होणार नाही याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, तशा प्रकारची कोणतीही काळजी संबंधीत वाहिनीच्या कंपनीने घेतली नसल्याचे दिसून आले. त्यामुळेच या वाहिनीवर करड उगवले आणि त्याने पेटही घेतला आणि अग्नीशामक दलाच्या सर्तकतेमुळे धोका टळला. अशाच प्रकारच्या निष्काळजीपणामुळे दहा वर्षांपूर्वी वास्कोतील वरूणापुरी येथील रस्त्यावरील भुमीगत नाफ्ता वाहिनीला गळती लागली होती. व एका रात्री त्या वाहिनीने पेट घेऊन एका जोडप्यासह चौघांना जीव गमवावा लागला होता. तसेच या भुमीगत वाहिनीला लागलेली गळती धाकतळे गावातही पोहोचल्याने गावातही आगीने थरकाप उडवला होता. यात दोघा शाळकरी मुलांना जीव गमवावा लागला होता.