गृहमंत्री अमित शहांचे आवाहन
प्रतिनिधी /वास्को
गोवा ही पवित्र भुमी आहे. या भुमीवरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची खुणगाठ बांधली गेली होती. देशाचा इतिहास बदलण्याच्या कार्याला इथूनच प्रारंभ झाला होता. गोवा ही भाजपाची शक्ती आहे. देशाबरोबरच गोव्याचा मागच्या दहा वर्षात भरीव विकास झालेला आहे. परंतु विकासाचे परीवर्तन समृध्दीकडे होण्याची गरज असून त्यासाठी गोमंकीयांनी पंतप्रधान मोदींचे हात बळकट करावेत. देश समृध्द बनल्यास गोवाही समृध्द बनेल असे प्रतिपादन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी वास्कोत केले.
वास्कोतील रेल्वे कम्युनिटी हॉलमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेचे आयोजन रविवारी रात्री करण्यात आले होते. या सभेला मर्यादीत कार्यकर्ते व नेत्यांची उपस्थिती होती. सभेच्या व्यासपीठावर केंद्रीयमंत्री जी किशन रेड्डी, श्रीपाद नाईक, दशर्ना जारदोष तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पक्षाचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे उपस्थित होते. या सभेनंतर गृहमंत्र्यांनी वास्कोसह, पणजी, मडगाव, म्हापसा, डिचोली या भागातील कार्यकर्त्यांशीही त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत मागर्दशन केले.
गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपा नेते स्व. मनोहर पर्रीकर यांच्या स्मृतींना उजाळा देत आपल्या भाषणाची सुरवात केली. गोव्याचे कुशासन मिटवण्याचे कार्य मनोहर पर्रीकर यांनी केले. त्यांनीच गोव्याला दूरदृष्टी दिली. त्यांनी गोव्याच्या साधनसुविधांच्या विकासासाठी कष्ट उपसले. मागच्या दहा वर्षांत गोव्याने भरीव विकास पाहिला. गोव्याच्या आधारावरच देशाने मजबुत विकास पाहिला. गोव्यात पूर्वी केवळ अस्थिरता होती. अराजकता होती. भाजपानेच स्थिर शासन आणि विकास दिला. गोव्याच्या काँग्रेसकडे गोव्यातील जनतेने विकासाचा हिशोब मागावा. लेखाजोखा मांडण्यास सांगावे. केंद्र सरकारने गोव्याला मागच्या सात वर्षात दहा हजार पाचशे कोटींचा विकास दिलेला आहे. त्यापूर्वी काँग्रेसने गोव्याचा किती विकास साधला होता याचा जबाब जनतेने काँग्रेसला विचारावा असे गृहमंत्री म्हणाले. काँग्रेसच्या 60 वर्षांच्या विकासापेक्षा भाजपाचा 7 वर्षांतील विकास भारी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीनी देशाची सुत्रे हाती घेतल्यापासून इतिहास कसा बदलला याची विवेचनही अमित शहा यांनी केले. ते म्हणाले, पूर्वी आपला देश पाकिस्तानशी दोन हात करायला धजत नव्हता. आता हा देश डोळे वठारून पाहू शकत नाही. त्यांना वेळोवेळी अद्दल घडवलेली आहे. काश्मीर 370 वे कलम हटवण्याचा निर्णय झाला तेव्हा काँग्रेस आणि तृणमुलसारख्या पक्षानी देशात रक्ताचे पाट वाहतील अशी धमकी दिली होती. मात्र कुणी दगडही मारू शकलेला नाही असे गृहमंत्र्यांनी नमुद केले.
गोवा ही भाजपासाठी शक्ती देणारी पवित्र भुमी आहे. इथूनच देशाचा इतिहास बदलण्याच्या पर्वाचा प्रारंभ झाला होता. गोव्यातच नरेंद्र मोदी देशाचे नेते बनले होते. त्यामुळेच देशाच्या विकासात गोव्याचेही योगदान आहे. भाजपा सरकारच्या काळात गोव्यात उभारण्यात आलेले रस्ते, पुल व इतर साधनसुविधांचा विकास मांडताना अमित शहा यांनी पुढील पाच वर्षांत गोवा अधिक विकास करणार आहे. गोव्याचा खाण उद्योग पुन्हा सुरू होणार आहे.
या सभेत उपस्थितांचे स्वागत नगरसेवक दीपक नाईक यांनी केले तर सुत्रसंचालन जयंत जाधव यांनी केले.