बाळासाहेब पाटील यांनी अंमलबजावणीची दिली ग्वाही
वार्ताहर / सावळज
महाराष्ट्र शासनाच्या महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेची नियमित कर्जदार प्रोत्साहन अनुदान व दोन लाखावरील कर्जमाफी अंमलबजावणी संदर्भात मंत्रीमंडळात यावर चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी तासगाव तालुक्यातील विकास सोसायटीच्या शिष्ट मंडळाला दिली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी अंमलबजावणीसाठी विलंब होत असल्याने तासगाव तालुक्यातील विकास सोसायटीच्या शिष्ट मंडळाने कराड येथील सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
ना. पाटील म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. कोरोना संकटामुळे राज्य सरकारवर
मोठा आर्थिक भार पडला असुन राज्य सरकार आर्थिक अडचणीतुन जात आहे. त्यामुळे अंमलबजावणीस उशीर झाला आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन सकारात्मक असुन याविषयी प्रधान सचिव यांना याविषयी योग्य कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिले.
यावेळी तासगाव तालुक्यातील सावळज, जरंडी, दहिवडी, वडगाव, बस्तवडे व सिध्देवाडी आदी विकास सोसायटीच्यावतीने सावळसिध्द विकास सोसायटीचे चेअरमन गणेश पाटील, संचालक प्रशांत कुलकर्णी, बाळासाहेब निकम, राजेंद्र सावळजकर, संदीप माळी व शैलेश पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.