कृष्णा इशारा पातळीच्या खाली, पण विसर्ग वाढवल्याने धास्ती कायम, सांगलीत दिवसभरात केवळ दिड फूट पाणी उतरले
प्रतिनिधी / सांगली
मदत व पुनवर्सनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्तांना तत्काळ 10 हजार मदतीची घोषणा पोकळ ठरली असून अद्याप कोणालाही मदत मिळाली नाही. तर सांगलीत कृष्णेची पातळी उतरण्याची गती अत्यंत धिमी आहे. दिवसभरात केवळ दीड फुट पातळी कमी झाली असून धरणांतील विसर्ग वाढल्याने नदीकाठाला धास्ती कायम आहे.
पूरग्रस्त घरी परतत असतानाच हवामान विभागाने काही जिल्हÎात अतिवृष्टीचा इशारा दिल्याने धरणातील विसर्ग वाढवला आहे. त्यामुळे पूरग्रस्तांची धास्ती वाढली आहे. काही भागातील पूरग्रस्त अद्याप निवारा केंद्रामध्येच आहेत. अनेक उपनगरे अद्याप पाण्यात आहेत. सांगलीत तीन तासाला एक इंच या गतीने पातळी कमी होत आहे. शुक्रवारी सायंकाळी आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पातळी 35.10 फूट होती.
सत्ताधारी मंत्री, नेत्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांचेही पूरपर्यटन सुरू आहे. महापुराचे पाणी कमी होत असतानाच आश्वासनांचा पाऊस सुरू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमध्ये `आपण पॅकेज मुख्यमंत्री’ नसल्याचे स्पष्ट करत भरीव मदतीची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांत मदतीची घोषणा करण्याचे आश्वासन सांगली दौऱयावेळी दिले. मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत तत्काळ 10 हजार मदतीची घोषणा केली. पण महाविकास आघाडी सरकारच्या या घोषणा केवळ घोषणाच राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. अद्याप सांगलीत तातडीची मदत मिळालीच नसल्याने नाराजी आहे. पंचनामे सुरू आहेत ही एकच बाब पूरग्रस्तांना सध्या समाधान देणारी आहे. शुक्रवारी धान्य वाटपालाही सुरवात झाली आहे.
अवघ्या 459 कुटूंबांना गहू, तांदळाचे वाटप, डाळ, केरोसिनचा पत्ता नाही
मोफत गहु, तांदूळ, तूरडाळ आणि रॉकेल देण्याचीही घोषण केली होती. शुक्रवारी उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते वाटपही केले. परंतु पूरबाधित कुटूंबांची संख्या 43 हजारांवर असतानाही अवघ्या 459 कुटूंबाना गहू आणि तांदूळ मिळाले तर रॉकेल आणि तूर डाळीचा अद्याप पत्ता नाही.
उर्जामंत्री राऊत, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम आणि आमदार मोहनराव कदम यांच्याहस्ते अंकलखोप, बुर्ली, आमणापूरमधील बाधितांना 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ दिले. जिह्यात 43318 पूरबाधित कुटुंब असून आतापर्यंत 459 कुटुंबाना 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ या प्रमाणे 4.59 मेट्रीक टन गहू, 4.59 मेट्रीक टन तांदूळाचे वाटप केले आहे. सांगली ग्रामीण 47 कुटुंबे, मिरज ग्रामीण 45 कुटुंबे, वाळवा 105 कुटुंबे, आष्टा 18 कुटुंबे, शिराळा 244 अशा 459 कुटुंबाचा समावेश आहे. तूरडाळ व केरोसिन उपलब्ध झाल्यास त्यांचेही वाटप त्वरीत करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. या दिरंगाईमुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
19 रस्त्यावरील वाहतूक अद्यापही बंदच
जिल्ह्यात अतिवृष्टी महापूर, भूस्खलन यासह इतर शंभरावर रस्ते आणि पूल बंद होते. तेथे वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था केली होती. आता पाणी ओसरले असले तरीही अद्याप मिरज, वाळवा, पलूस, तासगाव व खानापूर तालुक्यांमधील एकूण 19 रस्त्यावरील वाहतूक बंद आहे. त्यामध्ये 4 राज्य मार्ग व 15 प्रमुख जिल्हा मार्गांचा समावेश आहे.
कोयना धरणात 89 तर वारणा धरणात 31 टीएमसी साठा
कोयना आणि वारणेतील विसर्ग अनुक्रमे 50 व 14 हजार आहे. कोयनेतील साठा 88.75 आणि वारणेतील साठा 30.80 टीएमसीवर नियंत्रित केला आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण कंसात, क्षमता, विसर्ग पुढीलप्रमाणे. कोयना 89.07 (105.25,50125), धोम 10.30 (13.50 ,2990), कन्हेर 7.75 (10.10,3889), अलमट्टी 86.85 (123, 4.20 लाख).
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची पातळी पुढीलप्रमाणे ः कोयना पूल कराड 29.6 कृष्णा पूल कराड 22.0, बहे 10.3, ताकारी 36.10, भिलवडी 37.2, आयर्विन पूल सांगली 35.10 व अंकली पूल हरिपूर 43.1.