प्रतिनिधी / जत
स्व. राजारामबापूंचे जत तालुक्यावर अपार पेम होते. या तालुक्याला पाणी मिळावे म्हणून त्यांनी सांगली ते उमदी पदयात्रा काढली. दुर्देवाने बापूंचे अकाली निधन झाले, पण त्यांचे स्वप्न पूर्ण व्हावे, ही तमाम दुष्काळग्रस्तांची इच्छा होती. बापूंचा मुलगा म्हणून ही योजना मार्गी लावणे माझे कर्तव्य होते. यासाठी गेली वर्षभर एका कमिटीच्या माध्यमातून अभ्यास करण्यात आला. त्यातून आपल्याच राज्यातील हक्काचे आणि कायमस्वरूपी पाणी मिळावे यासाठी वारणा धरणातून दुष्काळी जत तालुक्यासाठी सहा टीएमसी पाण्याची उपलब्धता करण्यात यश आले आहे. आता ही योजना येत्या अडीच वर्षात मार्गी लावू, असे ठोस आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी दिले.
जत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित 65 गावातील शेतकऱ्यांच्या वतीने रविवारी उमदी येथे मंत्री जयंतराव पाटील यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष अविनाशकाका पाटील, सुरेशराव शिंदे, रमेश पाटील, ऍड. चन्नाप्पा होर्तीकर, सिध्दूमामा शिरसाड, ऍड. बसवराज धोडमणी, राहुल पवार, उत्तम चव्हाण, आप्पा पवार, अमोल डफळे, भरत देशमुख, एस. के. होर्तीकर, आर. के. पाटील, अण्णासाहेब गडदे, राजेंद्र कन्नुरे, शिवाजी शिंदे, ऍड. एम. के. पुजारी, ऍड. रेवूर, बिळ्याणसिध्द बिराजदार, उमदीच्या सरपंच वर्षाताई शिंदे, रेशमाक्का होर्तीकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना मंत्री जयंत पाटील पुढे म्हणाले, जत तालुका पिढ्यान् पिढ्या दुष्काळात जगतो आहे. या भागात पाणी आले पाहिजे, ही लोकभावना गेल्या अनेक वर्षांपासून आहे. अनेक आंदोलने पाण्यासाठीच झाली आहेत. माझे वडील स्वर्गीय बापूंनी तर जतच्या पाण्यासाठी सांगलीतून उमदीपर्यंत पदयात्रा काढली. बापूंचे पेम या तालुक्यावर होते, या लोकांनीही बापूंना खूप प्रेम दिले. तीच माया, ऋणानुबंध माझ्याशी या तालुक्याने तसाच कायम ठेवला आहे. त्यामुळे राज्याचा जलसंपदा मंत्री झाल्यापासून या तालुक्याला पाणी देण्याची खूणगाठ बांधली होती.
गेले वर्षभर आम्ही जतला कसे पाणी देता येईल, यावर अभ्यास केला. त्यातून वारणा धरणातून पाणी देण्यास लवादाची अडचण येणार नाही हे समोर येताच, तातडीने सहा टीएमसी पाणी देण्याचा निर्णय आमच्या विभागाने घेतला. यापूर्वी कर्नाटक सरकारशी देखील बोलणे केले होते. परंतु त्या राज्याने त्यांच्या योजनेतून पाणी देता येत नसल्याचे कळवले होते. इतर दोन पर्याय त्यांनी ठेवले होते. परंतु त्या राज्यातून योजना करताना त्यावर कंट्रोल त्यांचा राहणार होता. त्यामुळे आता आणखीन थोडा उशिर झाला तरी चालेल, पण शाश्वत आणि हक्काचे पाणी जतला देण्यासाठी नवी योजना करण्याचा निर्णय घेतला. यात पहिली पायरी चढण्यात आपण यशस्वी झालो आहोत. लवादाची कृष्णा खोऱ्यातील पाण्याला कसलीही अडचण न येता सहा टीएमसी पाणी उपलब्ध झाले आहे. हा निर्णय होताच तातडीने योजनेचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश कृष्णा खोरेला दिले आहेत. येत्या साडेतीन महिन्यात याचे डिझाईन तयार होईल. त्यानंतर पुढच्या सहा महिन्यात यावर मंत्रीमंडळाचा निर्णय, मान्यता, निधीची तरतूद या साऱ्या गोष्टी होतील, असे सांगून मंत्री जयंत पाटील म्हणाले, यानिमित्ताने आणखीन एक शब्द देतो, आपण पाण्याची खूप वाट पाहिली आहे. पण, ही योजना अवघ्या अडीच ते तीन वर्षात पूर्ण करुन घेवू. तसेच राज्यात आदर्शवत् अशी ही योजना असेल. बंदीस्त पाईप लाईन टाकून योजना करण्यात येणार आहे. यासाठी अत्याधुनीक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल.
म्हैसाळ टप्पा क्रमांक तीनमधून पुढे 36 किलोमीटरपर्यंत ग्रायव्हीटीने पाणी येईल. त्यानंतर मिरवाड व मल्लाळ येथे लिप्ट केले जाईल. जत हद्दीत हे पाणी चार वितरिकेच्या माध्यमातून वंचित 65 गावांना देण्यात येणार आहे. हे करताना मूळ म्हैसाळ योजनेतून काही तलाव भरत नसतील तर त्याचाही समावेश या योजनेत करण्यात येणार आहे. जेणेकरुन तलाव आणि वितरिकेच्या माध्यमातून किमान 50 ते 60 हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली आपण आणू, अशा पध्दतीने काम करणार आहोत. खरेतर आपण लोकांनी खूप हाल सोसले याची जाणीव मला आहे. पण, उशिरा का होईना जे पाणी तुम्हांला मिळणार आहे, त्याचा अभिमान वाटेल, अशा पध्दतीने ही योजना पूर्णत्वास नेऊ, असा शब्द देत असल्याचे मंत्री जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटलांनी शब्द खरा केला ः होर्तीकर
ऍड. चन्नाप्पा होर्तीकर म्हणाले, जत तालुक्याचा पाणीप्रश्न केवळ जयंत पाटीलच सोडवू शकतात, हा विश्वास आम्ही जतच्या जनतेला दिला होता. तो शब्द त्यांनी खरा केला आहे. कारण राजारामबापूंनी त्याकाळी यासाठी फार मेहनत घेतली होती, दुर्देवाने बापूंचे निधन झाले आणि हा तालुका पोरका झाला. पण, मंत्री जयंतरावांनी जतची नाळ तुटू दिली नाही. आज बापूंचे स्वप्न सत्यात येत आहे. त्यामुळे जतच्या या नव्या योजनेला स्वर्गीय राजारामबापू विस्तारीत योजना असे नामकरण द्यावे, असा ठराव मी मांडत असल्याचे त्यांनी जाहीर केले. याला शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवून पाठिंबा दिला. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी अनुमोदन दिले.
सावंतांनी फसवून आमदारकी मिळवली : सुरेश शिंदे
नेते सुरेशराव शिंदे म्हणाले, जत तालुक्याला गेली पंधरा वर्षे पाण्याच्या नावाखाली फसवणूक सुरु होती. कर्नाटकातून पाणी आणतो म्हणून विक्रम सावंत आमदार झाले, पण आज पाणी कोणी आणले हे जनतेला कळले आहे. यापुढे तालुक्यातील जनता खोट्या माणसांच्या नादाला लागणार नाही. मंत्री जयंतराव पाटील यांनी जतचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी चांगले खाते मिळत असतानाही जलसंपदा खाते घेवून आपली मागणी पूर्ण केली आहे. हा तालुका जयंत पाटील यांनी पुढच्या दहा पिढÎा तरी विसरणार नाही.
जयंतरावांना दुष्काळी जनतेचा आशीर्वाद : रमेश पाटील तालुकाध्यक्ष रमेश पाटील म्हणाले, 65 गावांना पाणी कसे मिळणार हा फार मोठा प्रश्न होता. परंतु मंत्री जयंत पाटील यांनी मोठ्या ताकदीने तो सोडवला आहे.