प्रस्तावावर पालकमंत्र्यांची मुख्य सचिवांबरोबर चर्चा : शासनाच्या आदेशाकडे लक्ष
सांगली, मिरजसह तासगाव, कवठेमहांकाळ, जतला मिळू शकते सूट : 174 गावांत मात्र निर्बंध कायम राहणार
प्रतिनिधी / सांगली
जास्त रूग्णसंख्या असणारी जिल्ह्यातील 174 गावे वगळून सांगली, मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ आणि जत शहरातील निर्बंध शिथिल करण्याच्या हालचाली राज्य शासनस्तरावर सुरू असल्याचे वृत्त आहे. प्रशासनाने पाठवलेल्या प्रस्तावावर पालकमंत्री आणि मुख्य सचिवांची चर्चाही झाल्याचे समजते. परंतु याबाबत सोमवारीही आदेश निघाला नाही. त्यामुळे निर्बंध शिथिलतेच्या आदेशाकडे नजरा लावून बसलेले व्यापारी आणि नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
कोविड पॉझिटीव्हीटी दर दहाच्या जवळपास आहे. त्यामुळे जिह्यातील निर्बंध शिथिल करण्याची मागणी वाढू लागली आहे. कोरोना महामारीचे संकट गंभीर आहे. परंतू गेल्या साडेतीन महिन्यापासून लॉकडाऊनचा सामना करणारे व्यापारी आणि नागरिकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पर्याय सूचवावेत, असे निर्देश राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिले होते. तर पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडेही व्यापाऱ्यांनी निवेदने दिली होती. नियम पाळून दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती.
निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. परंतू रविवारी उशीरापर्यंत त्यावर निर्णय झाला नव्हता. सोमवारी निर्णय अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु सोमवारीही उशीरापर्यंत निर्णय झाला नसल्याने व्यापाऱयांमध्ये नाराजी आहे. मिरज शहरात प्रशासनाचा विरोध झुगारून देत व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू केली. सांगलीतही व्यापारी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.
दरम्यान, निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात रविवारी पालकमंत्री जयंत पाटील यांची राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याशी चर्चा झाली होती. सोमवारी दुपारीही चर्चा झाली. परंतु उशीरापर्यंत निर्णय झाला नव्हता. त्यामुळे गेल्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत गेली तीन ते साडेतीन महिन्यापासून लॉकडाऊनचा सामना करणारे व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या नजरा शासनाच्या आदेशाकडे लागल्या आहेत.
दरम्यान, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जास्त रूग्णसंख्या असणाऱ्या जिल्ह्यातील 174 गावामध्ये कोरोनाचे निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहेत. तर सांगली मिरजेसह रूग्णसंख्या कमी असणाऱ्या तालुक्यांच्या शहरांतील निर्बंध शिथिल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यासंदर्भात पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम आणि मुख्य सचिव यांची चर्चा झाली आहे. तसा आदेशही निघण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
आदेशानंतर निर्णय घेण्यात येईल : बर्डे
दरम्यान, जिल्ह्यातील ज्या भागात कोरोना रूग्णांची संख्या कमी आहे. अशा भागातील निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. शासनाकडून अद्याप कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नाहीत. शासनाकडून निर्देश आल्यानंतर पुढील आदेश काढण्यात येतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यानी दिली.