प्रतिनिधी / सांगली
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सलग तिसऱया दिवशी पावसाची संततधार कायम राहिली. त्यामुळे वारणा,कोयनासह अनेक धरणातून विसर्ग सुरू केला आहे. ते पाणी वाढल्याने कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. अलमट्टी धरणातील पाणीसाठा, विसर्ग आणि पूर नियंत्रण यासंदर्भात जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आज शनिवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुराप्पांची भेट घेणार आहेत. उर्वरित जिल्ह्यात मात्र शुक्रवारी दिवसभर ऊनपावसाचा खेळ सुरू होता.
शिराळा तालुक्यात सलग तिसऱया दिवशी अतिवृष्टी झाली आहे. करंजमाई, अंत्री बुद्रूक, टाकवे लघुप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. गेल्या चोवीस तासात चांदोली वारणा धरणात 88 मिमी पाऊस झाला असून धरणाची पाणीपातळी तब्बल एक मीटरने वाढली आहे. कृष्णा, वारणा दुथडी वाहू लागल्या आहेत. महाबळेश्वरसह कोयना, वारणा धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार सुरू आहे. नृसिंहवाडी दत्त मंदिरापर्यंत पाणी पोहोचले आहे. कोयनेसह विविध धरणातून विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
शिराळा तालुक्यात 34.9 मि.मी. पाऊस
जिह्यात गेल्या 24 तासात सरासरी 17.5 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात 34.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 24 तासातील व एकूण पाऊस पुढीलप्रमाणे- मिरज 18.8 (190.9), जत 4.7 (115.7), खानापूर-विटा 3.9 (64.7), वाळवा-इस्लामपूर 34.7 (201.9), तासगाव 11.9 (131.7), शिराळा 34.9 (256.6), आटपाडी 0.2 (64.4), कवठेमहांकाळ 11.2 (108), पलूस 23.5 (192.1), कडेगाव 10.1 (132.8)
कोयनेतून 2100 तर वारणेतून 1600 क्यूसेक्स विसर्ग
शुकवारी सकाळी आठ वाजेपर्यंत वारणा धरणात 15.91 तर कोयना धरणात 35.13 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयनेतून 2100 आणि वारणेतून 1600 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत धोम धरण 5.16, कण्हेर 2.75, दूधगंगा 8.76, राधानगरी 2.51, तुळशी 1.77, कासारी 1.00, पाटगांव 1.73, धोम बलकवडी 0.82, उरमोडी 6.37, तारळी 3.14 आणि अलमट्टी धरणात 28.25 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
विविध धरणांचे सांडवे, कालवा आणि विद्युतगृहाद्वारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कण्हेर 24, वारणा 1600, दूधगंगा 1100, राधानगरी 1200, तुळशी 500, कासारी 250, पाटगाव 225, उरमोडी 950 व अलमट्टी धरणातून 451 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
आयर्विनजवळ पाणीपातळी 21 फूट
शुक्रवारी सायंकाळी सांगलीत आयर्विन पुलाची पातळी 21 फुटापर्यंत पोहोचली आहे. तर
कृष्णा पूल कराड-13.5, भिलवडी पूल 23, राजापूर बंधारा सांगली 33.6 फूट पाणीपातळी झाली होती.
आज बेंगलोरमध्ये मंत्रीपातळीवर बैठक
पूरनियंत्रणासाठी पालकमंत्री जयंत पाटील आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुराप्पा, तसेच कर्नाटक जलसंपदा विभाग यांची बेंगलोरमध्ये आज शनिवारी बैठक होत आहे. मंत्री जयंत पाटील शुक्रवारीच बेंगलोरला पोहोचले आहेत. सांगली, कोल्हापूर आणि सातारा येथील महापुराला अलमट्टी धरणातील पाणीसाठÎाचा फुगवटा कारण असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जलसंपदा विभागामध्ये समन्वय ठेवून अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग ठेवण्यात येईल. त्यामुळे पूर नियंत्रणास मदत होणार असल्याने या बैठकीकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.