प्रतिनिधी / विटा
गावकऱ्यांनी राजकारण बाजूला ठेवून या गंभीर परिस्थितीशी एकजुटीने सामना करणे आवश्यक आहे. प्रत्येक गावात लस उपलब्ध करून ज्या त्या गावचे लसीकरण त्याच गावात होण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. तरुणांनी पुढाकार घेऊन आपले गाव कोरोनाच्या विळख्यातून वाचविण्याच्या दृष्टीने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केले.
खानापूर तालुक्यात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हा परिषद माजी सुहास बाबर यांनी खानापूर तालुक्यातील वेजेगाव, भिकवडी, भेंडवडे, साळशिंगे, देवनगर, सांगोले, जोंधळखिंडी, वाळूज या गावांना भेट दिली. ग्रामदक्षता समिती आणि आरोग्य विभागाकडील ग्रामीण भागात काम करणाऱ्या आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांचेशी संवाद साधला. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी बाबत विचारणा केली.
या अडचणीच्या काळात ग्रामस्थांनी घरा बाहेर पडू नये. पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरी आवश्यक ते साहित्य पोहोच करण्यासाठी स्वयंसेवक नेमा. कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, म्हणून त्यांना तिरस्काराची वागणूक देऊ नका. गावात विना मास्क कुणीही फिरणार नाही, पॉझिटिव्ह व्यक्ती गावात इतरत्र फिरणार नाही, याबाबत कडक निर्बंध लागू करावेत. वारंवार सांगून देखील प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत नाहीत त्यांची नावे पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशनला कळवावीत. ग्रामसेवक आणि पोलिस पाटील यांनी पुढाकार घ्यावा आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर करवाई करावी. अशा सूचना बाबर यांनी दिल्या.
सध्या ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. तालुक्यात कोणत्याही दवाखान्यात बेड शिल्लक नाही. परिस्थिती अतिशय विदारक झाली आहे. गटातटाचे राजकारण बाजूला ठेवा. राजकारण करण्याची ही वेळ नाही. अजूनही वेळ गेली नाही. गावासाठी काहीतरी करून दाखवायची वेळ आली आहे. प्रत्येक गावात लस उपलब्ध करून ज्या त्या गावचे लसीकरण त्याच गावात होण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. पॉझिटिव्ह व्यक्तींच्या घरासमोर कंटेनमेंट झोन चे बोर्ड लावून कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी प्रयत्न करा. तरुणांनी पुढाकार घेऊन आपले गाव कोरोनाच्या विळख्यातून वाचविण्याच्या दृष्टीने प्रशासनाला सहकार्य करावे, असं बाबर म्हणाले.