प्रतिनिधी / मिरज
लग्न समारंभात केवळ 25 लोकांची उपस्थिती मर्यादा असताना 50 लोकांची गर्दी जमविल्याप्रकरणी महापालिकेने शहरातील किल्ला भाग येथील एका मंगल कार्यालयाला 50 हजारांचा दंड केला. सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांच्या पथकाने शनिवारी सकाळी ही कारवाई केली. मंगल कार्यालय चालकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशाराही सहाय्यक आयुक्त घोरपडे यांनी दिला.
शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास किल्ला भागातील एका मंगल कार्यालयात लग्नसमारंभ आयोजित केला होता. मात्र, उपस्थिती मर्यादा 25 असताना 50 नातेवाईक जमले होते. कार्यालयात गर्दी झाल्यानंतर तेथील रहिवाशांनी महापालिका सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांच्याकडे तक्रार केली. घोरपडे यांनी एक पथक घेऊन कार्यालय गाठले. त्यावेळी 50 हून अधिक लोकांची गर्दी झाल्याचे निदर्शनास आले. पथकाने गर्दीचा व्हीडीओ करुन पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. कार्यालय चालकाने प्रारंभी दंड भरण्यास नकार दिला. मात्र, वधू-वरांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर कार्यालय चालकाने दंड भरला.