बेळंकीतील घटना, पावसाचा तालुक्यातील दुसरा बळी
प्रतिनिधी / मिरज
तुडुंब भरलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने ट्रक्टर विहिरीत कोसळून राजेश लक्ष्मण जाधव (29, रा. बेळंकी) या शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तालुक्यातील बेळंकी येथे गुरूवारी रात्री ही घटना घडली. आयुष हेल्पलाईन टीमच्या जवानांनी जेसीबीच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढला. पावसाने तालुक्यात दुसरा बळी गेला आहे.
गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मिरज तालुक्याच्या विविध गावातील ओढ्याना पूर आला आहे. शेतांमधील विहिरी, शेततळे पाण्याने तुडुंब भरले आहेत. गुरूवारी मल्लेवाडी येथे ओढ्याच्या पाण्यात सहा जण वाहून गेल्याची घटना घडली. तर एका महिलेचा मृत्यू झाला होता. याच दिवशी रात्री बेळंकी येथे पावसाच्या पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने राजेश जाधव हे ट्रक्टरसह पाण्यात बुडाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. जेसीबीच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला.