आम आदमीचे महावितरण अभियंत्यांना निवेदन
प्रतिनिधी / मिरज
कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यातच वीज महावितरण कंपनीकडून दमदाटी करत सक्तीची वीज बिल वसूली सुरू असल्याने नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. त्यामुळे खासगी सावकरांप्रमाणे सुरू असलेली ही वसूली तात्काळ थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आम आदमी पक्षाच्यावतीने देण्यात आला
आम आदमी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव वसीम मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष झोहेब मुल्ला, युवा जिल्हाध्यक्ष सागर भोसले, रवी बनसोडे, निसार मुल्ला, अरिफ मुल्ला, श्रीकांत चंदनवाले, परवेज पटेल, तौफिक हवालदार आदी कार्यकर्त्यांनी वीज महावितरण अभियंत्यांना निवेदन दिले. महावितरणच्या वसूली विरोधात अनेक तक्रारी आहेत. महावितरणने खासगी एजन्सी मार्फत वसूली कर्मचारी भरती करुन घेऊन पठाणी पध्दतीने वसूली सुरु केली असल्याच्या तक्रारी आहेत. शासन आदेश येईपर्यंत बिले वसूली करु नये, अशी मागणी आहे.