प्रतिनिधी / सांगली
महासत्तेचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आर्थिक समता आणि सामाजिक न्याय या दोन महत्त्वाच्या घटकावर आधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. देशाच्या विकासासाठी साहित्यिकांनी दिलेले योगदान नक्कीच महत्त्वाचे आहे. शाश्वत ग्रामीण विकासाचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी समाजातील विविध घटकांनी अधिक सक्रिय झाले पाहिजे. असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
सांगली येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, नव्या आर्थिक सुधारणांची हीच खरी वेळ आहे. देशात आर्थिक व सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आर्थिक व सामाजिक साक्षरतेची गरज आहे. प्रा. संजय ठिगळे लिखित ‘अर्थभान’ पुस्तक अर्थसाक्षरतेच्या क्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी पार पाडीत आहे. सध्याच्या ऑनलाईनपद्धती विषयी बोलताना जोशी म्हणाले की, ऑनलाईन पद्धतीने शिक्षण व्यवस्थेत अनेक बदल होत असले तरी शिक्षकांचे महत्व कधीच कमी होणार नाही.
प्रारंभी स्वागतपर भाषणात प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, भारताने अनेक क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. मराठी विश्व कोश निर्मिती मंडळाचे सदस्य प्रा.संजय ठिगळे म्हणाले की, भारताच्या सर्वागीण विकासासाठी अर्थसाक्षरतेवर अधिक भर देण्याची नितांत गरज आहे. या प्रसंगी महाविद्यालयाच्या विज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभा पाटील, कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. तानाजी सावंत, प्रा. पद्माकर जगदाळे, प्राध्यापक व शिक्षकेत्तर सेवक उपस्थित होते.