मालमत्तेचे नुकसान, लहान मुले व महिला भयभीत, माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी
वार्ताहर / सावळज
सावळज येथे गेली दोन वर्षे लोकवस्तीत माकडांचा वावर आहे. मात्र काही दिवसांपासून १५ हुन अधिक असलेल्या माकडांच्या टोळीचा उपद्रव वाढला आहे. माकडे गावात धुमाकूळ घालत नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करू लागल्याने या माकडांची दहशत निर्माण झाली आहे. या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले असून लहान मुले व महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे माकडांच्या टोळीचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थातून करण्यात येत आहे.
मागील दोन वर्षांपुर्वी सावळज परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अन्न, पाण्याच्या शोधात रानावनातील माकडांच्या टोळीने मोर्चा लोकवस्तीकडे वळवला होता. माकडांविषयी उत्सुकता असलेले नागरिक खरकटे, शिल्लक अन्न माकडांना खाऊ घालत होते. त्यामुळे माकडांनी लोकवस्तीतील झाडांवरच मुक्काम ठोकला. गेली दोन वर्षे ही माकडांची टोळी लोकवस्तीत वावरत असुन माकडाच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
सध्या १५ हुन अधिक संख्या असलेल्या माकडांच्या टोळीचा नागरिकांना उपद्रव होऊ लागला आहे. ही माकडे अनेकांच्या कौलारू घरांवर उड्या मारून कौलांची मोडतोड करीत आहेत. तसेच अनेकांच्या पाण्याचे सोलरच्या पाईप फोडण्यासह फळा- फुलांच्या झाडांचे नुकसान करीत आहेत. तर विद्युत पुरवठ्याच्या व टि.व्ही केबलला लोंबकळुन केबल तोडत आहेत तसेच नागरिकांच्या इतर साहित्याचे ही नुकसान करून माकडांनी हैदोस घातला आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
काही दिवसांपासून या माकडांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले असून माकडांच्या दहशतीने लहान मुले व महिला वर्गात भीतीचे वातावरण आहे. काही महिन्यांपूर्वी येशील अंगणात खेळत असलेल्या एका लहान मुलावर माकडाने हल्ला ही केला होता. मात्र सुदैवाने त्या बालकास कोणतीही इजा झाली नव्हती. या उपद्रवी माकडांच्या टोळीला हुसकावण्याचा नागरिकांनी प्रयत्न केला पण हा प्रयत्न असफल ठरत आहे. त्यामुळे या माकडांच्या टोळीचा ग्रामपंचायत प्रशासन व वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.