नवी दिल्ली : भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) नव्या लोगोचे अनावरण बुधवारी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी केले. 1982 मध्ये साईची स्थापना झाली होती. त्यानंतर पहिल्यांदाच लोगोमध्ये बदल करण्यात आला आहे.
नव्या लोगोमध्ये ‘एसएआय’ ही अक्षरे मोठी व ठळकपणे ठेवण्यात आली असून त्याच्या मागील बाजूस ऍथलीट्सची यशाकडे झेप घेणारी प्रतिमा चित्रित करण्यात आली आहे. येथील मेजर ध्यान चंद नॅशनल स्टेडियमवर आयोजित केलेल्या छोटय़ाशा कार्यक्रमात त्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी क्रीडा सचिव रवि मित्तल, साईचे सरसंचालक संदीप प्रधान, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बात्रा व अन्य उपस्थित होते.
क्रीडामंत्रालयाची सूत्रे स्वीकारली त्यावेळीच हा लोगो बदलून साधा व अर्थपूर्ण लोगो बनविण्याचा निर्णय घेतला होता, असे रिजिजू यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.