देशमुखनगर / वार्ताहर :
सातारा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या अंगापूर तर्फ तारगांव गावची ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्याच्या द्रष्टीने ग्रामस्थ व प्रमुख कार्यकर्त्यांनी एकमुखी निर्णय घेतला. त्यादृष्टीने गावची वाटचाल सुरू असून, गावच्या कारभारात महिलाराज येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी नऊमहिलांची निवड केली असून, या सर्व महिलांचे अर्ज छानणीत वैद्य ठरले आहेत. त्यामुळे आता ग्रामपंचायतीचा कारभार महिलाच पाहाणार आहेत. हे आता स्पष्ट झाले आहे. गावच्या या ऐतिहासिक निर्णयांचे परीसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.
मागील सहा महिन्यापासून गावात ग्रामपंचायत निवडणूकीच्या तयारीसाठी गटातटाचे राजकारण सुरू होते. यावरून ही निवडणूक मोठ्या चुरशीची होईल, असे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, निवडणूका जाहीर होताच सुज्ञ ग्रामस्थांनी बैठकीच्या माध्यमातून गावपातळीवरील निवडणुकीतून राजकीय ईर्षे पायी होणाऱ्या परिणामांची माहिती दिली. वाडा, भावकी, आळी, घराघरात नव्हे तर सख्खे भाऊ यांच्यात वितुष्ट निर्माण होते. त्याबरोबर निवडणूकीतून होणारा वारेमाप खर्च यासर्व बाबीचा संदर्भ दिला. अशा मुळे त्याचा दुरगामी परीणाम सामान्य नागरीकांवर होतो. यासाठी गावतील लोका-लोकातील संघर्ष कमी करून गांवच्या विकासासाठी एकत्र येवून निवडणूक बिनविरोध करण्याची साद घातली. याला ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला.यामुळे निवडणूक बिनविरोध चा मार्ग मोकळा झाला आहे.