प्रतिनिधी / सातारा
किल्ले अजिंक्यतारा येथे रविवार दि. २३ रोजी धर्मरक्षक राजधानी सातारा या संस्थेमार्फत राबविण्यात आलेली संवर्धन मोहीम यशस्वीपणे पार पडली. या मोहिमेत गडावरील बऱ्यापैकी बुजत चाललेल्या दुसऱ्याही धान्य कोठारातील गाळ व दगड बाहेर काढले. या अगोदर ही एका धान्य कोठाराचे संवर्धन करण्यात आले आहे.
गटकोट संवर्धनासाठी कार्य करणारे धर्मरक्षक राजधानीचे मावळे सातत्याने किल्ले अजिंक्यताऱ्यासाठी प्रयत्न करत आहेत. रविवारी त्यांनी आयोजित केलेल्या मोहिमेनुसार सकाळी गडावर सुजय खलाटे, मयुर सुर्यवंशी, गणेश कदम, हर्षवर्धन माळी, निरज कदम, विशाल शिंदे, गणेश कुंभार, सुहास माळी, विक्रम भुजबळ, सागर माळी, कुणाल शिंदे, सौरभ बनकर, विशाल जाधव, यश माळी, महेश कदम, अमित कदम, सचिन फडतरे, संपत फडतरे, प्रणीत पालकर यांच्यासह मावळे पोहचले. नियोजन केल्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज की जय चा जयघोष करत एकेक मावळ्यांनी कामाला सुरुवात केली. बघता बघता दुसरे कोठार ही स्वच्छ करून त्याचे संवर्धन केल्याचे काम फत्ते होताच पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय ची गगनभेदी घोषणा दिली. हे काम सुरू असताना विशाल शिंदे यांनी किल्ले अजिंक्यताऱ्यावरील कोठाराचे महत्व सांगितले.