रयत क्रांती संघटनेने दिला कारखानदारांना इशारा
सातारा / प्रतिनिधी :
साखर कारखान्यांनी तोडून नेलेल्या ऊस बिलाची एफ.आर.पी. रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर चौदा दिवसांच्या आत जमा करणे बंधनकारक आहे. मात्र, ती सातारा जिल्ह्यातील कारखान्यांकडून दिली जात नाही. येत्या चार दिवसात कारखान्यांनी एफ.आर.पी.ची रक्कम जमा न केल्यास रयत क्रांती संघटना कारखान्यांच्या गव्हाणीत उड्या टाकून आंदोलन छेडेल, असा इशारा संघटनेने निवेदनाद्वारे दिला.
निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना निवेदन देताना रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधूकर जाधव, युवकचे जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 2020-21 च्या गळीत हंगामात शेतकऱ्यांचा तोडून नेलेल्या उसाच्या एफआरपीची रक्कम 14 दिवसाच्या आत देणे बंधनकारक असतानासुद्धा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी लाखो टन ऊसाचे गाळप केलेले आहे. पंरतु, तोडून नेलेल्या उसाच्या बिलाचे एफआरपीच्या रक्कमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेल्या नाहीत. ही बाब शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याच्या हेतूने साखर कारखानदार एफआरपीची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करत नाहीत. तरी हंगामातील गाळप झालेल्या उसाची एफआरपीची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्यात यावी, येत्या चार दिवसात रक्कम जमा न झाल्यास गव्हाणीत उड्या टाकून आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेने दिला.