प्रतिनिधी / तारगाव
तारगाव ता.कोरेगाव येथील रेल्वे स्टेशन शेजारी इंदिरानगर वसाहती शेजारी रेल्वे किलोमीटर Chainage १७७ ते १७८ दरम्यान असणाऱ्या ओढ्यावरील जुन्या रेल्वे पुलाचा भरावाचा भाग कोसळला असून रेल्वे प्रवासी मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे गाड्यांना धोका निर्माण झालेला आहे. तारगाव येथील रेल्वे स्टेशनच्या दक्षिणेकडील बाजूस असणाऱ्या जुन्या ब्रिटिशकालीन पुलाची संरक्षक भिंत (Retaining Wall) चे फाऊंडेशन रेल्वेच्या कंत्राटदाराने पोकलेनच्या ब्रेकरच्या साह्याने तोडले, तसेच फाउंडेशन पूर्णपणे मोकळे झाल्याने खालचा भाग खचला आहे.
सदर ट्रॅकवरून रेल्वेची वहातूक सुरू असल्याने पुलाच्या इतर भागावरती दाब येऊन पुलावरील मातीच्या भराव्याचा काही भाग कोसळला असून रेल्वेच्या गाड्यांना मोठा धोका निर्माण झाला.आहे सदर ठिकाणी मोठ्या अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सध्या स्थितीत सुरू असणारे रेल्वेचे काम हे दर्जाहीन असल्याने तारगाव स्टेशन वरील प्लॅटफॉर्मवरील काम सुद्धा गुणवत्तापूर्ण नाही.
याबाबत रेल्वे विभागाचे Quality Control (गुणवत्ता तपासणी) विभागाने डोळ्यावर पट्टी बांधली आहे. या संदर्भात रेल्वे विभागाच्या अधिकारी व कंत्राटदारांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. गतवर्षी पावसाळ्यामध्ये रेल्वे किलोमीटर Chainage- १७३ टकले व बोरगाव गावच्या पुलाशेजारी रेल्वे गाड्यांना असाच धोका निर्माण झाला होता, त्यावेळेस संपूर्ण दीड ते दोन महिने गाड्या सदर ठिकाणी संथ गतीने धावत होत्या अजूनही सदर ठिकाणी कोणतीही परिस्थिती उद्भवू शकते.रेल्वे विभागाचा कारभार भूसंपादनासह सर्व ठिकाणी गलथान असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रेल्वेची वरिष्ठ प्रशासन यंत्रणा व जिल्हा प्रशासन यंत्रणा यांनी या बाबींवर लक्ष देणे गरजेचे आहे भविष्यात एखादा मोठा रेल्वे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.