वंचित बहुजन आघाडीचा साविआला प्रश्न
सातारा / प्रतिनिधी :
शासनाने एखादा पुरस्कार जाहीर केला की, संबंधित कार्यात जोमाने सहभाग घेतला जातो. त्यासाठी कर्मचाऱ्यांचा वापर करून सहभाही होताना सातारा पालिका पुढे दिसते. पण गेली 14 महीने झाले तरी सातारा शहरात एखादे कोविड सेंटर किंवा विलगीकरण कक्ष काढावे असे पालिकेला सुचले नाही, ही बाब खेदाची आहे. शासनाने ग्रामपंचायतींना 15 व्या वित्तआयोगातून विलगीकरन कक्षास मान्यता दिली. त्याच अनुषंगाने पालिका 15 व्या वित्तायोगामधून तरी विलगीकरन कक्ष उभारणार का असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, पालिकेच्या छोटय़ा मोठय़ा चुकीच्या बरोबर कामामध्ये सतत दोन्ही आघाडीमार्फत दोन्ही आघाडीचे नेते हे लक्ष घालत असतात. पालिकेचे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष व त्यांचे नेते एकाच पक्षाचे नेतृत्व मानतात. त्यांच्याच विचाराच्या पक्षाचे सरकार केंद्रात सत्तेत आहे. असे असताना सातारा शहरात कोरोना संक्रमण वाढत असताना सर्वसामान्य जनतेला चांगली आरोग्यसूविधा मिळावी यादृष्टीने शहरात एकही कोविड सेंटर किंवा विलगीकरण कक्ष उभारण्यास कोणतीही ठोस भुमिका नगरपालिकेने व सताधाऱयांनी घेतली नाही. यामुळे साताऱ्याच्या जनतेबाबत काही बांधिलकी आहे की नाही, याचा विचार करून पालिकेने ठोस पावले उचलावीत.
कोविड सेंटर, विलगीकरण कक्ष उभारणीत इतर पालिकांनी 25 बेडची उभारणी केली तर सातारा पालिकेने शंभर बेडची उभारणी का करत नाही याचाही जाब जनतेने नगरपालिकेला आणि नेत्यांना विचारला पाहिजे, त्यासाठी जनतेने जागृत राहून आपल्या पालिकेकडे पाहिले पाहिजे. सत्तेतील खासदार उदयनराजे तर विरोधी गटाचे नेते आमदार शिवेंद्रराजे हे दोघे ऐकमेकाकडे बोट दाखवत व ऐकमेकांचे चिमटे काढत वेळ घालवत आहेत. त्यांना व पालिकेला जनतेचे काहीच पडले नाही. त्यांची नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा देण्याची मानसिकता दिसत नाही. त्यामुळेच की काय साताऱयात स्लम भागात एखादे विलगीकरण कक्ष उभारण्याचे धाडस पालिकेने व त्यांच्या नेत्यांनी दाखवले नाही. ही बाब चिंतेची आहे. याचा जाब जनतेने विचारला पाहिजे.
15 व्या वित्त आयोगातून कोणत्याही भ्रष्टाचाराला थारा न देता कमीत कमी एक हजार बेडचे विलगीकरण कक्षाची उभरणी करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, जिल्हा उपाध्यक्ष संदिप कांबळे, गणेश कारंडे, जिल्हा सचिव गणेश भिसे, सुधाकर काकडे यांनी केली आहे.