80 किलो कचरा केला गोळा
प्रतिनिधी/ सातारा
“आपले किल्ले आपली जबाबदारी’’ अनुषंगाने सातारा पोलीस दलामार्फत किल्ले वैराटगड या ठिकाणी गडभ्रमंती व स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये वाई उपविभागातील वाई, पाचगणी, महाबळेश्वर, भुईंज, व मेढा या पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. तसेच सातारा पोलीस दलातर्फे या मोहिमेबाबतची लिंक प्रसारित करण्यात आल्यामुळे सातारा जिल्हयातील नागरीक देखील मोहिमेमध्ये सहभागी झालेले होते.
या मोहिमेदरम्यान किल्ले वैराटगडाच्या पायथा येथील भवानी माता मंदिर, आसले येथे एकत्रीत येवून चढाई (ट्रेक) करण्यात आली. तसेच समुह तयार करुन किल्ल्यावरील किल्ले वैराटगड येथे नियोजनबध्द स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. स्वच्छता मोहिमेदरम्यान पाण्याने भरलेला तलाव कोरडा तलाव, किल्ल्यावरील सदर येथील झाडे झुडपे काढून स्वच्छता करण्यात आली. सदर मोहिमेदरम्यान जैविक व अजैविक अंदाजे 80 किलो कचरा गोळा करण्यात आला. त्यानंतर वैराटेश्वर मंदीर सभा मंडपात राहुल गोळे, वैराटेश्वर प्रतिष्ठान, व्याजवाडी व रोहन भोसले, भुईंज यांनी वैराटगडाबद्दल व गड संवर्धन बद्दल माहिती दिली.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, वाई विभाग, वाई, उपविभागीय पोलीस अधिकारी शितल जानवे, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. एस. भरणे, भुईंज पोलीस ठाणे सहायक पोलीस निरीक्षक आर. एस. गर्जे, स.पो.नि. मेढा पो. ठाणे एस. व्ही. तासगावकर, स.पो.नि., पाचगणी पो.ठाणे आर. जे. माने, पो.उ.नि. महाबळेश्वर पो. ठाणे श्री. बिद्री, असे 12 पोलीस अधिकारी, 70 पोलीस अंमलदार व 115 नागरिक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता.
आतापर्यंत 544 किलो कचरा गोळा
दिनांक 15/01/2023 रोजी पासून सातारा पोलीस दलामार्फत आयोजित आपले किल्ले आपली जबाबदारी मोहिमेअंतर्गत अजिंक्यतारा, वसंतगड, जरंडेश्वर, वैराटगड या ठिकाणी गड मोहिम व स्वच्छता मोहिम राबविण्यात आल्या असून मोहिमेत आज अखेर 60 पोलीस अधिकारी, 369 पोलीस अंमलदार, 690 नागरीक व विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवून एकुण अंदाजे 544 किलो कचरा गोळा करुन योग्य विल्हेवाट लावण्यात आली आहे. सातारा पोलीस दलामार्फत प्रत्येक रविवारी सातारा जिल्हयातील एक किल्ला निवडून सदरची मोहिम राबविण्यात येणार असून या मोहिमेमध्ये नागरिक, व्यापारी व तरुणांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आव्हानही सातारा जिल्हा पोलीस दलाच्यावतीने करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे नवीन पिढीमध्ये इतिहासाबद्दल जनजागृती होण्यास देखील मदत होणार आहे.