वृत्तसंस्था/ ढाका
सॅफ यू-20 महिला फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये भारत व यजमान बांगलादेश यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.
प्रारंभी भारताने जोरदार सुरुवात करीत अनेक संधी मिळविल्या. सुमती कुमारीला सातव्याच मिनिटाला भारताला आघाडी मिळवून देण्याची संधी मिळाली होती. नितू लिंडाने तिला पास पुरविला होता. मात्र बांगलादेशची गोलरक्षक रुपना चकमाने अप्रतिम बचाव करीत तिची ही संधी वाया घालवली. 15 व्या मिनिटाला सुनीता मुंडाने शुभांगी सिंगकडून आलेल्या क्रॉसला फ्लिक केल्यावर रुपना चकमाने पुन्हा एकदा अप्रतिम गोलरक्षण करीत ही संधी फोल ठरवली. 30 व्या मिनिटाला शुभांगीने कॉर्नवर अचूक गोल नोंदवला, असे तिला वाटले. काजोलने तिचा फटका गोलमध्ये मारला होता. पण पंचांनी चेंडू गोलमध्ये जाण्याआधीच बाहेर गेल्याचे सांगून हा गोल नाकारला.
उत्तरार्धात बांगलादेशच्या शाहिदाने दूरवरून गोलच्या दिशेने फटका मारला होता. पण तिचा हा फटका जाळय़ाच्या वर पडल्याने त्यांची ही संधी वाया गेली. या सत्रात काजोलने लांबवरून मारलेली फ्री किक टार्गेटच्या दिशेने मारली होती. पण चकमाने पुन्हा एकदा त्यावर बचाव केला. काही मिनिटाला चकमाने भारताची आणखी एक संधी वाया घालवली. भारताचे आता 2 सामन्यातून 4 गुण झाले असून त्यांचा पुढील सामना नेपाळविरुद्ध मंगळवारी होणार आहे. दुपारी 2.30 वाजता हा सामना होणार आहे.