सातारा : राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दि. 22 फेब्रुवारी पासून राज्यात सामाजिक, धार्मिक कार्यक्रम, मिरवणूक, मोर्चे, यात्रांवर शासनाने बंदी घातली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे दि. 01 मार्च, 2021 पर्यंतचे सर्व नियोजित कार्यक्रम, बैठका रद्द केल्या आहेत. गृहविभागाच्या अत्यंत तातडीच्या व महत्त्वाच्या बैठका गरजेनुसार गृहविभागामार्फत देण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन करुन घेणार असल्याची माहिती देसाई यांनी दिली.
कोरोनाला रोखण्यासाठी ‘होय मीच जबाबदार’ ही मोहिम राबवून मास्क घालणे,सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरने हात धुणे हा त्रिसुत्री कार्यक्रम राबवून लॉकडाऊन टाळण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री यांनी राज्यातील जनतेला केले आहे. त्याचे पालन राज्यातील जनतेने काटेकोरपणे करावे व शासनाच्या नियमांचे पालन करुन कोरोना टाळावा, असे आवाहनही देसाई यांनी केले.