वाई / प्रतिनिधी :
वाई-मांढरदेव रस्त्यावर मांढरदेव गावच्या हद्दीत काळूबाईच्या जाळीलगत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून, संबंधित युवकाचा अज्ञात व्यक्तींनी खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह फेकून दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले.
संदीप शांताराम कदम ( वय ३६,मूळ गाव निघावणी पो पालवणी, ता मंडणगड, जि रत्नागिरी, हल्ली कल्याण) असे मृताचे नाव आहे.
मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मांढरदेव येथील काळुबाईच्या जाळी लगत अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला होता. गावापासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दरीत हा मृतदेह फेकून देण्यात आला होता. वाई पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस पाटलांनी खबर दिल्यामुळे आकस्मित मृत्यूची नोंद झाली होती. याबाबतची माहिती सातारा पोलिसांनी सर्वत्र कळविल्यानंतर संदीप कदम यांची पत्नी व नातेवाईकांनी वाई येथे येऊन मृतदेह ओळखला. सदरचा इसम कॅब चालक आहे. २० डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता तो कलंबोली ते कोल्हापूर भाडे घेऊन गेला होता.२१ डिसेंबरला रात्री त्याचा संपर्क होत होता. परंतु २२ डिसेंबर पासून त्याचा संपर्क नातेवाईकांना होऊ शकला नाही. त्यामुळे २४ डिसेंबरला कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात संदीप कदम बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली. त्यानंतर नातेवाईकांकडे शोध घेतला तरी ते सापडले नाहीत.
मंगळवार (दि २९) रोजी मांढरदेव गावच्या हद्दीत सापडलेल्या मृतदेहा बाबत पत्नी संजना संदीप कदम यांना कल्याण पोलिसांनी माहिती दिली. यानंतर संजना कदम यांनी दिर व पतीच्या मित्रासोबत वाईला येऊन मृतदेह पहिला असता तो संदीप शांताराम कदम यांचा असल्याचे उघडकीस आले. त्याप्रमाणे वाई पोलीस ठाण्यात संजना कदम यांनी अज्ञात व्यक्तींनी पतीचे अपहरण करून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मांढरदेव येथील दरीत फेकल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दिली.त्याप्रमाणे अज्ञात व्यक्तींविरोधात अपहरण करून खुनाचा गुन्हा दाखल केला असून तो कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे..