राज्यस्तरीय निवडणूक समितीच्या सदस्यपदी निवड
वार्ताहर / औंध
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांच्या व्यवस्थापनाकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यस्तरीय निवडणूक व्यवस्थापन समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या सदस्यपदी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या खटाव- माणचे नेते हरणाई सूतगिरणीचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांना संधी देण्यात आली आहे.
राज्यस्तरीय १३ सदस्यीय समितीच्या अध्यक्षपदी प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात आहेत. तर उपाध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर आहेत. समितीच्या समन्वयकपदी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ऍड. गणेश पाटील आणि सदस्यपदी प्रदेश सरचिटणीस माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री पद्माकर वळवी, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, प्रकाश मुगदिया, सरचिटणीस राजाराम पानगव्हाणे, इब्राहिम भाईजान, महेंद्र घरत, प्रविण देशमुख, प्रदेश चिटणीस नाना गावंडे, रणजीत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेश पातळीवरील या कमिटीसोबतच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय निवडणूक व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. हरणाई उद्योग समुहाचे संस्थापक रणजितसिंह देशमुख काही दिवसांपूर्वी स्वगृही परतले आहेत. त्यांना या समितीच्या माध्यमातून राज्य पातळीवर काम करण्याची संधी पक्षाने दिली आहे.
मिळालेल्या संधीचे सोने करेन
काँग्रेस पक्षाने विश्वासाने राज्यस्तरीय जबाबदारी सोपवली आहे. मिळालेल्या संधीचे सोने करून पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करेन.
–रणजितसिंह देशमुख, चेअरमन हरणाई उद्योग समुह