सातारा / प्रतिनिधी :
शासनाच्या निर्णयाप्रमाणे आजपासून राज्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू झाली असून, आज सातारा जिल्ह्यात येणारे सर्व मार्ग सील करण्यास सुरुवात झाली आहे. शिरवळ, निरानदी पूल, नीरा हे मार्ग बंद झाले असून इतर मार्ग ही बंद करण्याचे काम सुरू आहे, त्याच प्रमाणे आज सातारा शहरातील ही मुख्य रस्त्याला जोडणारे सर्व छोटे रस्ते ही बंद करण्यात येणार आहेत. त्याकरिता नगर परिषद मुख्याधिकारी बापट, शहर पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, शाहूपुरी पोलीस निरिक्षक संजय पतंगे यांनी शहरात फिरून सर्व्हे केला असून, आज सायंकाळी 4 वाजल्यापासून शहरातील सर्व छोटे रस्ते, गल्ल्या, बोळे बांबू लावून बंद करण्यात येणार आहेत.
त्यामुळे शहरात विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर आळा बसेल आणि पोलीस यंत्रणेचाही ताण काहीसा कमी होण्यास मदत होईल, असे मांजरे यांनी सांगितले.