विविध उतारे,नोंदी रखडल्याने जनता संतप्त
वार्ताहर / वाठार किरोली
राज्य सरकारच्या महसूल विभागाच्या तलाठी कार्यालयाशी संबंधित “सर्व्हर”गेले दहा दिवस बंद असून,गावातील लोकांना दिवसभर थांबूनही मोकळया हाताने परतावं लागत आहे. सातारा जिल्ह्यासह कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली गावासह परिसराची अशी अवस्था आहे. सातारा जिल्ह्यात कोरेगावमध्ये तर अतिशय विचित्र अवस्था आहे. तलाठी गावात असो अथवा मुख्यालयात,जिथं “सर्व्हर”च अगदी हळू किंवा पूर्ण बंदच असेल तर ऑनलाइन उतारे,नोंद कमी करणे,नोंद घालणे, जमीन व्यवहार, बँक कर्ज प्रकरण,पंचायत समितीच्या विविध योजना, कृषी विभागाच्या विविध योजना,तहसील विभागातील विविध योजना, अशा अनेक योजनांसाठी ऑनलाइन सात बारा,खाते उतारे प्रामुख्याने लागत असतात.तर तलाठी अण्णांना इतर ही कामे असल्याने ऑनलाइन उतारे काढून देण्यासाठी दिवस भर “सर्व्हर”जवळ बसणं शक्य नाही.
मात्र वेळ हा गरजू जनतेचा जातोय, दिवसभर “सर्व्हर”आला,गेला या खेळातच बसावं लागत असून शेवटी रिकाम्या हातानं घराकडे जावं लागत आहे. आता सध्या पीक कर्ज वाटप हंगाम सुरू आहे, त्यामुळे लोकांना खाते उतारा / ७/१२ लागत आहेत पण सर्व्हर नसल्याने गैरसोय होत आहे. तरी याबाबत शासनाने त्वरित दखल घेऊन जनतेला होणारा नाहक त्रास थांबवण्याची मागणी सर्व स्तरांवर होत आहे याबाबत तलाठी यांचेशी संपर्क साधला असून लवकरच विना अडथळा “सर्व्हर” पुन्हा सुरू होण्यासाठी प्रयत्न शील असल्याचे सांगण्यात आले.