सातारा / प्रतिनिधी :
शासन योजनांचा लाभ घेत असलेल्या लोकांना हयातीचा दाखला बदलल्याने अडचणी वाढल्या आहेत. प्रशासनाच्या विहीत नमुन्यातील अर्ज बँका स्वीकारत नाही. यामुळे लोकांना योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे.
राज्य शासनाच्या श्रावण बाळ निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना, व इंदिरा गाधी निराधार योजनेच्या माध्यमातून वृध्द लोक, विधवा आदी लोकांना आर्थिक मदत मिळत आहे.
या योजनेतील लार्भाथ्यांना आर्थिक उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. यामुळे त्यांना शासनाच्या पेंशनवर अवलंबून रहावे लागते. या पैकी असे अनेकजण आहेत कि त्यांची चूल या पैशाशिवाय चालु शकत नाही. हयातीचा दाखला दिला नाही तर या पैशापासून त्यांना वंचित रहावे लागणार आहे. शासनाने याबाबत योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे.
हयातीच्या दाखल्याचा प्रशासनाने जो अर्ज तयार केला आहे. तो अर्ज बँका स्वीकारत नाहीत. त्यामुळे निराधारांना या कार्यालयातून त्या कार्यालयात हेलपाटे घालावे लागत आहेत. कोरोनाच्या महामारी काळात योजनेच्या लाभार्थ्यांना सर्वत्र पायपीट करावी लागत आहे. विशेष म्हणजे यामधील अनेक लाभार्थी कुठल्या न कुठल्या व्याधीने ग्रस्त आहेत. या वयोवृद्धांची कुंचबना लवकर थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.