अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली फिरणाऱ्यांची संख्या बक्कळ, मॉर्निंग वॉकला गर्दीच गर्दी
प्रतिनिधी / सातारा
कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतोच आहे. तो आटोक्यात येण्याची काही चिन्हे दिसेनात. प्रशासन त्यांच्यापरीने मेहनत घेत आहे. परंतु सातारा शहरातील परिस्थिती पाहिल्यानंतर मोरीला बोळा अन् दरवाजा उघडा असाच प्रकार सध्या सुरु आहे. नाक्यावर बॅरिकेट, मोती चौकात बॅरिकेट लावले असले तरीही मुख्य मार्ग मात्र सुरुच असल्याने अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सातारकरांची शहरातून रपेट मात्र थांबत नाही. त्यामुळे शहरात मोरीला बोळा अन् दरवाजा उघडा असाच प्रकार सुरु आहे. बोळाबोळात पोलीस थांबून गस्त वाहन धारकांना विचारणा करत आहेत. अशाच कारणाने आज सकाळी राजवाडा परिसरात एका युवकाने दोन वाहतूक पोलिसांना चांगलेच खडेबोल सुनावले.
शहरात वाढत चाललेली कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आणि शहर कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने मुख्याधिकारी अभिजीत बापट हे सातत्याने प्रयत्न करत आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडून दररोज निघात असलेल्या नवनव्या आदेशाची अंमबजावणी साताऱ्यात केली जात आहे. शहरातल्या सातारा शहर पोलीस ठाणे आणि शाहुपूरी पोलीस ठाण्याच्यावतीने ब्रेक द चैन अंतर्गत पहिल्याच दिवसांपासून खडा पाहारा सुरु केलेला आहे. परंतु पोलिसांनी ज्या ज्या ठिकाणी बॅरिकेट लावलेले आहेत. त्याचा पर्यायी मार्ग लगेच सातारकर शोधून त्या मार्गाने घुमजाव करताना दिसत आहेत. सकाळी 11 पर्यंतच अत्यावश्यक सेवा सुरु असल्या तरीही त्यानंतर शहरातील रस्त्यावर अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली वाहने चकाट फिरत आहेत. पोलिसांनी चुकून एखाद्या वाहनधारकाला रागाच्या भरात विचारले तर वादावादीचे प्रकार घडू लागले आहेत. राजवाडा परिसरात गुरुवारी सकाळी असाच एका युवकाने दोन वाहतूक पोलिसांना चांगलेच खडेबोल सुनावल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, सातारा शहरात छोट्य़ा छोट्य़ा रस्त्यांना आता बंदोबस्त ठेवला असल्याने मोरीला बोळा अन् दरवाजा उघडा असा प्रकार सुरु आहे.
मॉर्निंग वॉकला गर्दी
शहरातील नागरिक मार्निंग वॉकला गर्दी करत आहेत. त्यामुळे मॉर्निंग वॉकच्या जाणाऱ्या रस्त्यावर विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांच्या का कारवाई होत नाही. अशा लोकांच्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत नाही काय ?, असाही सवाल उपस्थित होत आहे.
महामार्गावर वाहतूक सुरुच
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक सुरुच आहे. हॉटेल्स, ढाब्यांमध्ये पार्सल सुविधा मिळत असल्याने मालट्रकसह इतर वाहतूक तुरळक प्रमाणात सुरु असल्याचे दिसते. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त वाहतूक सुरु असून काही खाजगी बसेसही सुसाट सुरु असतात. त्याकडे ऐवीतेवी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस टोलनाक्यावर उभे राहून त्यांच्याकडून दंड वसूल करत असतात. आता मात्र, महामार्गावरुन होत असलेल्या वाहतूकीमध्ये कोण येत आहे कोण जात आहे याचा काहीच पत्ता लागत नाही.
कडक भूमिका गरजेची
सातारा शहरासह जिह्यातील वाढत चाललेल्या कोरोनाला ब्रेक लावायचा असेल तर कडक भूमिका गरजेची आहे. परंतु ही भूमिका घेताना किमान नागरिक आपलेच आहेत. त्यांच्याशी कठोरपणाने न वागता समजेल अशाच भाषेत प्रशासनाने सांगितले तर अधिक उत्तम होईल, अशीही मागणी होत आहे.