प्रतिनिधी / सातारा :
पुष्पा स्टाईल रक्तचंदनाची तस्करी करणारी टोळी मिरज (ता. सांगली) पोलिसांनी काही दिवसापूर्वी जेरबंद केली. या टोळीकडून तब्बल अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त करण्यात आले. या प्रकरणात आणखी तपास करण्यात येत असून या रक्तचंदनाचा पुरवठा साताऱ्यातील ग्राहकाला करण्यात येणार असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामुळे मिरज पोलिसांनी तपासाची चक्रे साताऱ्याच्या दिशेने वळविली आहेत.
काही दिवसांपूर्वी सातारा वनविभागाने व्यापक चळवळ राबवत चंदन चोर व प्राण्यांचे अवयव बाळगणाऱ्यावर धाड टाकून मोठय़ा प्रमाणावर मुद्देमाल हस्तगत केला होता. या प्रकरणाचे धागे-दोरे नाशिकपर्यंत पोहचले आहेत. यामुळे मिरज पोलिसांनी रक्तचंदनाच्या साठय़ावर केलेली कारवाईला विशेष महत्त्व आले आहे. याउलट मिरज पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासात संशयिताने हा रक्त चंदनाचा पुरवठा साताऱ्यातील ग्राहकाला होणार असल्याची माहिती दिल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. साताऱ्यातील तो ग्राहक कोण जो रक्तचंदनाची खरेदी करणार होता. याचा तपास करण्यासाठी साताऱ्यात पथके रवाना झाली आहेत. बेंगलोर मार्गे मिरज व्हाया सातारा असे हे रक्तचंदन येणार होते का? साताऱ्यात नेमका कुणाला पुरवठा होणार होता? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच गेल्या काही वर्षापुर्वी केरळ बॅँकेत झालेल्या रॉबरीचे धागे-दोरे ही साताऱ्याशी संबंधित आहेत. यांचा ही तपास सुरू आहे. यामुळे साताऱ्यात वाढते गुन्हेगारीचे जाळे सातारा जिल्हा पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढत आहेत. साताऱ्यातून गुन्हेगारी प्रवृत्ती बाहेर पडत आहेत. अनेक बडे धेंडे साताऱ्यात बसून नियोजन करत आहेत. परंतु यांची माहिती जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना सोडा अधिकाऱ्यांना होत नसल्याने त्यांच्या तपासावर ताशेरे ओढले जातात.