सातारा / प्रतिनिधी :
कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या किसान आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सातारा येथे बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली विविध शेतकरी संघटनांनी रस्ता रोखून ‘चक्का जाम’ आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी थाळीनाद करत ‘खाली मुंडी वर पाय, या मोदी सरकारचं करायचं काय’ अशा सरकारविरोधी घोषणा देत केंद्राचा निषेध नोंदवला.
सातारा पोलिसांची आंदोलनकर्त्यांपेक्षा मोठी संख्या होती. त्यामुळे पोलिसांनी केवळ दहा मिनिटातच आंदोलनकर्त्यांना पोलीस गाडीत बसवले. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, प्रकाश कांबळे, अमर गायकवाड, काँग्रेसच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष सुषमा राजेघोरपडे, शिवसेनेचे माजी नरेंद्र पाटील, ॲड. वर्षा देशपांडे, शैला जाधव आदींचा सहभाग होता. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी येथे मोठा बंदोबस्त ठेवला होता.
आंदोलनकर्त्यांचे फोटो सेशन अन् वाहतूक कोंडी
शेतकऱ्यांच्या चक्काजाम आंदोलनात काही आंदोलनकर्त्यांचे कार्यकर्तेच कॅमेरे घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसलेल्या आंदोलकांचे फोटो टिपत होते. या आंदोलनामुळे सातारा-कोरेगाव रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. काही वेळातच पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.