गोवा तृणमूल काँग्रेसचा आरोप
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील टॅक्सी चालकांच्या मूलभूत समस्यांचे निराकरण करण्यात विद्यमान भाजप सरकारला पूर्ण अपयश आले असून सामाजिक सुरक्षा धोरण तयार करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे, अशी जोरदार टीका तृणमूलच्या राज्यसभा खासदार सुश्मिता देव यांनी केली आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्यावेळी गोवा ’टीएमसी’चे नेते जयेश शेटगावकर आणि अँथनी मिनेझिस यांची उपस्थिती होती. राज्यात सुमारे 30 हजार लोक टॅक्सी व्यवसायात आहेत. मंदावलेली अर्थव्यवस्था आणि कोविड गैरव्यवस्थापन यामुळे टॅक्सी व्यावसायिकांना जबरदस्त धक्का बसला आहे. तरीही सरकारने त्यांच्यासाठी कोणतेही धोरण राबविले नाही. उलटपक्षी विविध कर आणि मीटर बसविण्याची सक्ती करून त्यांच्या आर्थिक संकटात भरच घातली आहे, असा आरोप शेटगावकर यांनी केला.
सध्यस्थितीत पर्यटन हाच राज्यासाठी आर्थिक स्रोत मिळवून देणारा प्रमुख व्यवसाय आहे आणि टॅक्सी चालक हे गोव्याची नस आहेत. तरीही या घटकासाठी किंवा पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी दीर्घकालीन अशी कोणतीही योजना विद्यमान सरकारने राबविली नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली, असे शेटगावकर पुढे म्हणाले.
येत्या निवडणुकीत तृणमूल सत्तास्थानी आल्यास सर्वप्रथम टॅक्सी व्यवसायाला उभारी देण्यासाठी कार्यक्रम हाती घेण्यात येईल. तसेच टॅक्सी चालकांना दीर्घकालीन मदत, व त्यांच्या कुटुंबियांसाठी शिक्षण आणि आरोग्य सेवा यासारख्या महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करेल, असे त्यांनी सांगितले.
पर्यटन उद्योगासाठी भाजपचे योगदान काय? : देव
भाजप सरकारच्या अपयशावर तीव्र हल्ला चढवताना सुष्मिता देव यांनी, राज्य सरकारचा सर्वाधिक महसूल पर्यटन उद्योगातून येत असतानाही मुख्यमंत्री आणि भाजप सरकारने या उद्योगासाठी कोणते योगदान दिले? याचे उत्तर गोवा भेटीवर येणाऱया गृहमंत्री अमित शहा यांनी द्यावे, असे आव्हान दिले.
टॅक्सी चालकांना व्यवसाय सुरु करण्यात मदत करण्याच्या दृष्टीने तृणमूलने सर्व टॅक्सी चालकांना एकरकमी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय सरकार स्थापन केल्याच्या 100 दिवसांच्या आत टॅक्सी चालकांसाठी मीटर इंस्टॉलेशन शुल्कावर 100 टक्के परतावा देण्यात येईल, अशे आश्वासन देऊन देव यांनी पक्षाच्या जाहीरनाम्यात वचन दिलेल्या कल्याणकारी उपायांबद्दल माहिती दिली.